🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत ३९ आमदारांनी बंड पुकारले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एक प्रकारे राजकीय भूकंप आला. या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर दोन दिवसांनी एकनाथ शिंदे व भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. दरम्यान या काळात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर विविध प्रकारे टीका केली होती. एकनाथ शिंदे गटाने व भाजपने मिळून सत्ता स्थापन केल्यानंतर आता राजकीय वातावरण स्थिर झाले आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदार हे आपापल्या मतदारसंघात परतले आहेत.
यादरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “बंडखोरांनो तुम्ही विकले आहात, त्यापेक्षा कामठीपुऱ्यात पाटी लावून उभं राहा” अशा आशयाचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. याच विधानाचा समाचार संजय शिरसाट यांनी घेतला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, “हे मूर्ख लोक अशाप्रकारचं वक्तव्य कसं करतात? याचंच आम्हाला वाईट वाटतं. अशी टीका करण्याचा त्यांना अधिकार काय आहे. त्यांच्यापेक्षा फार कडवट आम्ही बोलू शकतो. पण यांना लाज वाटली पाहिजे. बंडखोरी करणाऱ्या आमदारांमध्ये ४ महिला आमदार होत्या, असं असताना त्यांनी आम्हाला वेश्या म्हटलं.”
संजय शिरसाट राऊतांचा समाचार घेताना म्हणाले की, “बंडखोरी करणाऱ्यांमध्ये तुझी बहीण किंवा आई असती, तर तू असा बोलला असता का? बंडखोर महिलांना वेश्या म्हणणाऱ्यांना एकेदिवशी लोक जोड्याने मारतील. या आमदार महिला कुणाची तरी बायको, कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी लेक आहे. त्यांना वेश्या म्हणणाऱ्यांना महाराष्ट्र सहन करेन का? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी विचारला आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर बंडखोर महिला आमदार रडल्याचंही त्यांनी सांगितलं. “हीच शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे का? एक दिवस येईल, आता त्यांना त्यांची लायकी कळेल,” असंही शिरसाट म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
