🕒 1 min read
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले. तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या निकालानंतर विरोधक शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( मनसे ) देखील शिवसेनेवर टीका केली आहे.
मनसे नेते संदिप देशपांडे यांनी शिवसेनेवर तिखट प्रहार केला आहे. “शिवसेना ही महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि ‘ढ’ टीमचे कप्तान तोंडावर आपटले”, अशी टीका संदिप देशपांडे यांनी केली आहे.
शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 11, 2022
शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार यांचा विजय होणारच, असा दावा शिवसेनेकडून केला जात होता. मात्र मतमोजणीनंतर संजय पवार यांना ३८ मतं तर धनंजय महाडिक यांना ४१ मतं मिळाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला.”
संजय राऊत यांची प्रतिक्रिया!
“आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार अर्थातच पक्षाचे आमदार तिकडे गेले नाही तर काही अपक्ष आमदार त्यांच्याकडे गेले. काही जणांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्यात आला. तर कुठे वेगळे व्यवहार झाले. आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण त्यांचा विजय झाला, असे मी समजत नाही. पहिल्या पसंतीची ३३ मतं संजय पवार यांना मिळाली. तर धनंजय महाडिक यांचा दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर विजय झाला. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांचा हिशोब झाला असता तर आम्ही जवळपास जिंकलो होतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
