मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणारला पाठिंबा दिला आहे. यावर भाजपचे नेते राज ठाकरेंच्या भूमिकेवर खुश आहेत. नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजप नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु नाणार प्रकल्पाला पहिल्यापासूनच विरोध करणाऱ्या शिवसेनेला राज ठाकरेंची ही भूमिका चांगलीच झोंबली असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर नाणार सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. यावरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नाणारमध्ये २२१ भूमाफियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे का?, असा सवाल करत हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी नाणार वासियांसमोर भूमिका मांडावी, असे आव्हानच विनायक राऊत यांनी दिले आहे. विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘राज ठाकरे यांनी कोकणात येऊन नाणार प्रकल्प येऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. आता त्यांचे मतपरिवर्तन कशासाठी झाले, हे माहित नाही. २२१ गुजराती लोकांनी जमिनी खरेदी केल्या त्यांच्या भल्यासाठी ही भूमिका घेतली आहे का?’ असा सवाल विनायक राऊत यांनी केला आहे.
याचबरोबर, नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. विरोध करणारे हजारो लोक आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी त्यांची ही भूमिका जनतेसमोर जाऊन मांडावी, असे आव्हानच विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांनी दिले आहे. तसेच, नाणार प्रकल्प महाराष्ट्रातच राहणार आहे. राज्याच्या बाहेर जाणार नाही. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, हा प्रकल्प नाणारला राहणार नाही, हे निश्चित आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.
२०१८ मध्ये राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, असा इशारा दिला होता. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कार्यालय झाले सुंदर पण अंगणातील नाल्याचे काय?
- रामाच्या नावाने होतंय पाप ! राम मंदिर ट्रस्टने घेतला निधी संकलनाबाबत मोठा निर्णय
- ‘जोर से छाप, टीएमसी साफ’, मोदींचा बंगालमध्ये नारा
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- शेतीमालाच्या रक्षणासाठी एक नवी शक्कल; शेतकरी बनला स्मार्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

