🕒 1 min read
पुणे : राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केला आहे. तसचे भाजप सोबत सत्ता देखील स्थापन केली आहे. मात्र हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा केला. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देखील दिले आहे. दरम्यान शिवसेनेच्या चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
शरद पवार म्हणाले, “धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वादविवाद वाढवणे हे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे किंवा इतरांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते जरूर स्वतःचा पक्ष काढू शकतात ते चिन्ह करू शकतात. माझे काँग्रेससोबत मतभेद झाले तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला. घड्याळ हे वेगळे चिन्ह घेतले. आम्ही त्यांचे चिन्ह मागितले नाही आणि वाद वाढवला नाही. पण काही ना काही तरी करून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत.”
भाजप मित्र पक्षांना हळूहळू संपवत आहे-
“भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी भाषणात स्पष्ट सांगितले की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. नितीश कुमार यांची तक्रार आहे की, भाजप सोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे,” असा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे.
शिवसेनेवर भाजपने आघात केला-
शरद पवार म्हणाले, “पंजाबमधील अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. तो पक्ष भाजपने जवळपास संपुष्टात आणला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एकप्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते. नितिश कुमार हे लोकमान्यता असलेले नेतृत्व आहे. मागील निवडणुकीत नितिश कुमार आणि भाजप एकत्र लढले. परंतु भाजपचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की ते निवडणुकीत एकत्र येतात आणि मित्रपक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील याची काळजी घेतात. हे महाराष्ट्रातही घडले. असेच चित्र बिहारमध्येही दिसायला लागले. बिहारचे मुख्यमंत्री वेळीच सावध झाले आणि भाजपपासून दूर होण्याची भूमिका त्यांनी घेतली. आज भाजपचे नेते त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करत आहेत पण नितिश कुमार यांनी टाकलेले पाऊल अत्यंत शहाणपणाचे आहे. उद्या जे संकट भाजप त्यांच्यावर आणणार आहे त्याची वेळीच नोंद घेऊन त्यांनी खबरदारी घेतली. त्यांनी राज्याच्या आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय घेतला.”
केंद्र सरकारवर शरद पवार यांचा घणाघात –
“आमची अपेक्षा होती की १२ तारखेपर्यंत संसदीय अधिवेशन चालेल पण संसद चालविण्यासंबंधीची आस्था केंद्र सरकारमध्ये आहे असे गेल्या काही वर्षांत आम्हाला जाणवलेले नाही. ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा ते अधिवेशन बंद करतात, चर्चेचा मार्ग बंद करतात. लोकांना आपली मतं मांडण्याची संधी जी सदनामधून मिळते ती थांबवतात आणि आपल्याला हवे तसे काम करतात. लोकसभा आणि राज्यसभा कामकाज लवकर बंद करण्यातून हे पाहायला मिळाले”, असे शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Bachchu Kadu | जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार – बच्चू कडू
- Bihar | सरकार नवीन, मुख्यमंत्री तेच! बिहारमध्ये ‘नितीश कुमार सरकार’, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री!
- Bachchu Kadu | “जो उशिरा आला त्यांना पहिल्या पंगतीत बसवले आणि…” – मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
- Bihar | काँग्रेस नितीश कुमारांना युपीएचे संयोजक पद देणार?, तर शरद पवारांसाठी हि धोक्याची घंटा असणार?
- Tata Motors | टाटाने Ford चा प्रोडक्शन प्लांट घेतला विकत, फोर्डच्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
