नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल(५ डिसें.) समारोप झाला. याच पार्श्वभूमीवर आज(६ डिसें.)शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी यासंदर्भात आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’अन्यायाविरुद्ध विद्रोह करणे हा अनेक लेखकांसाठी आज देशद्रोहाचा मामला ठरलाच आहे . २०१४ सालीच स्वातंत्र्य मिळाले असे सांगणाऱ्यांच्या देशात शेकडो निर्दोष लोक सरकारी निर्णयांचे बळी ठरले आहेत . नोटाबंदी , कोविड , शेतकरी आंदोलनात सात वर्षांत लोकांना मरण पत्करावे लागले . हे सर्व लेखकांचे , कवींचे चिंतनाचे विषय का ठरू नयेत ? जावेद अख्तर यांनी नेमके त्याच मुद्दय़ावर बोट ठेवले आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले असले तरी जावेद अख्तर(Javed Akhtar) यांच्या भाषणावर आणखी काही काळ चर्चा ही होत राहील.’
पुढे ते म्हणाले की, नाशिकच्या ९४ व्या साहित्य संमेलनाने मराठी भाषेला काय दिले यापेक्षा देशाला आणि समाजाला काय दिले?हाच प्रश्न आहे. महाराष्ट्राने देशाला सदैव देण्याचीच भूमिका घेतली. त्यात मराठी भाषेचेही योगदान आहे. नाशकातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी साहित्यिकांना आवाहन केले आहे की, ‘शरणागत होऊ नका, गुडघे टेकू नका.’ मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून जावेद यांनी संपूर्ण देशाला हा संदेश दिला आहे. जावेद अख्तर हे परखड वक्ते व कवी आहेत. त्यांच्या लिखाणातली आग अमिताभसारख्या नटाच्या मुखातून बाहेर पडली. देशात सध्या अघोषित निर्बंधांचा काळ सुरू आहे. लिहिणारे व बोलणारे दबले आहेत, तर काही जण या दबावतंत्राची वाहवा करण्यातच धन्यता मानीत आहेत. हे भय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकरांमधील लेखकाने स्पष्टच सांगितले होते, ‘लेखण्या मोडा व हाती बंदुका घ्या!’ पण सावरकर सोडले तर कोणीच हाती बंदूक घेतली नाही. लिहिण्या-बोलण्यावर निर्बंध येतात तेव्हा लेखक मंडळी सगळय़ात आधी बोटचेपी भूमिका घेतात व आपण कसे कुंपणावरचे, तटस्थ आहोत असे दाखवतात.
दरम्यान, अख्तर यांनी साहित्यिकांच्या या धोरणावर हल्ला चढविला आहे. पूर्वी ठामपणे बोलणाऱ्यांना धोकादायक म्हटले जायचे. आता त्यांना देशद्रोही ठरवले जाते. तरीही आपण बोलते राहिले पाहिजे, असे ते सांगतात. लोकांना एकमेकांशी सहज बोलता यावे म्हणून भाषा निर्माण झाली, पण भाषा हीच आजच्या संवादातील भिंत झाली आहे. भाषेच्या पलीकडे जग आहे हे आपण विसरलो आहोत. अख्तर पुढे सांगतात ते महत्त्वाचे. लोकशाहीमध्ये सरकार आणि राजकारणी जसे महत्त्वाचे, तसेच साहित्यिक आणि सामान्य नागरिक यांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याचे बळ जात, धर्म, प्रांत या भेदाभेदात नव्हे, तर भारतीयांच्या एकतेतून येते. साहित्यिक सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत नसतील तर तुमची लेखणी काय कामाची? हा सवाल त्यांना विचारायला हवा, असेही अख्तर सांगतात व सद्यस्थितीवर त्यांनी लेखकांचेही कान उपटले आहेत. भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या लेखण्या म्हणजे शेळय़ा-मेंढय़ांच्या शेपटय़ांप्रमाणे आहेत. या शेपटय़ा देशाच्या कामाच्या नाहीत. स्पष्ट बोलणाऱ्यांना घेराबंदी करून टोचले जाते. जावेद अख्तरही त्या परिस्थितीतून गेले आहेत. त्यामुळेच त्यांच्या मनातील वेदना उसळून बाहेर पडली. आणीबाणीत लेखन स्वातंत्र्याची गळचेपी झाली, त्याचा शोक आजही व्यक्त केला जातो, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- शाई फेक करणं पूर्णपणे चूकीचं; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- अशा घटना महाराष्ट्राला शोभत नाहीत; शाई फेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
- कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे; गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा राऊतांकडून निषेध
- …पण ती संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; दरेकारांचं शाईफेकला समर्थन


