नवी दिल्ली : परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बचा मुद्दा भाजपकडून राष्ट्रीय स्तरावर उचलण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. परमबीर सिंह हे सर्वोच्च न्यायालयाच्या यंत्रणेचा वापर करुन राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. तशी वेळ आली तर महाराष्ट्र सरकाराने विचार करायला हवा, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत दिला आहे.
‘देशाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नाही, दबाव आणला जातो, असे त्यांनी म्हटले होते. मग परमबीर सिंह हेदेखील न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर असाच दबाव आणू पाहत आहेत का,’ असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत मंगळवारी दिल्लीत पत्रकारपरिषदेत बोलत होते. ‘परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन लोकसभा आणि राज्यसभेत भाजपच्या खासदारांनी थयथयाट केला. मात्र, नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना आयपीएस अधिकारी संजीव भट आणि अधिकारी शर्मा यांनी तत्कालीन सरकारवर अशाच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यांची ही पत्र आम्ही समोर आणली तर भाजपचे नेते असाच थयथयाट करायला तयार आहेत का,’ असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
पुढे त्यांनी भाजपावर आरोप केले आहेत. ‘माजी आयपीएस अधिकारी संजीव भट आणि शर्मा यांनी तत्कालीन गुजरात सरकारवर असेच लेटरबॉम्ब टाकले होते. यानंतर संजीव भट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हा भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर कोणतीही कारवाई केली नव्हती. आम्ही ही पत्र समोर आणली तर कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद आणि भाजपचे नेते त्यावर कारवाईची मागणी करतील का? भाजपा महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय, का लावत आहे,’ असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फेरफारासाठी लाच स्वीकारणारा मंडळ अधिकारी, सरपंच अटकेत
- जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती; हे मिम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही !
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- अखेर बेन स्टोक्सने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण…


