अमरावती – कोविड काळात अमरावतीच्या मध्यवस्तीत वसलेल्या हिंदू स्मशान संस्थेवर येणारा अंत्यसंस्कारांचा ताण शहरात असलेल्या विविध स्मशानांकडे वळता करून या परिसरातील लोकांना होणारा असह्य त्रास कमी करावा, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून किंवा जिल्ह्या बाहेरूनही उपचारार्थ अमरावतीत आलेल्या कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांचे पार्थिव अमरावतीच्या हिंदू स्मशान संस्थेत अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. गेल्या 2 महिन्यात या स्मशानात अभूतपूर्व गर्दी आहे. या स्मशानात सर्व सोयी उपलब्ध असल्याने सर्वच मृतांच्या नातेवाईकांचा याच स्मशानात अंत्यसंस्कार करण्याकडे कल असतो.
काल रात्री स्मशानाच्या कुंपणाच्या बाहेर नाल्याच्या काठावर प्रेत जाळले गेले. एकूणच स्मशान परिसरात अस्वच्छतेचा कळस गाठला गेला आहे. स्मशानाचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेचा उद्देश सेवाभावी आहे, यात शंका नाही. मात्र, त्यांच्याही क्षमतेच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्या आहेत.कोविड प्रेताला पीपीई किट्स सह जाळले जाते. त्याचा दुर्गंध परिसरात पसरतो. अवती भोवती असलेल्या सर्व कॉलनीतल्या घरांवर गॅसदाहिनीची राख भुरभुर उडून येते. मृताच्या नातेवाईकांनी वापरलेल्या पीपीई किट्स, मास्क व कपडे नष्ट करण्याला शिस्त नसल्याने संपूर्ण परिसर खराब झाला आहे. आता हे स्मशान गावाबाहेर राहिलेले नाही. चारही बाजूंनी प्रचंड लोकवस्ती झाली आहे.
या स्मशानावर येणारा ताण कमी करण्यासाठी शहरातील विविध स्मशानांमध्ये जिल्हा प्रशासनाने तात्काळ सोयी उभ्या केल्या पाहिजे. दिवस रात्र याच स्मशानातील गॅसदाहिनी चालू ठेवण्यापेक्षा शहराच्या विविध भागात असलेल्या स्मशानांमध्ये गॅसदाहिनी लाऊन ताण कमी केला जाऊ शकतो. जेणे करून कोरोनाकाळ संपल्यावर देखील विविध भागात अंत्यसंस्काराच्या व्यवस्था राहतील. जिल्हा प्रशासनाने हिंदू स्मशान संस्थेचीच मदत व मार्गदर्शन घेऊन बडनेरा सह शहरातील इतही स्मशानांचे अद्ययावतीकरण करावे, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
आज या परिसरातील संतप्त लोक पुन्हा स्मशान परिसरात एकत्र झाले होते. त्यांच्या भावना तीव्र होत्या. लोकांनी स्वतः भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना स्मशानात बोलवून तिथल्या अत्यावस्थेची हालत दर्शवली. परिसरातील लोकांच्या समस्येचे निराकरण न झाल्यास लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावेळी भाजपचे स्वाती कुलकर्णी, लविना हर्षे, अजय सारसकर , प्रणित सोनी आणि जितेंद्र कुरवाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण…; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या धास्तीने बाजारपेठांत गर्दी; संचारबंदीचा नियम धाब्यावर
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’


