नंदूरबार : पैशांसाठी तरुणांना जाळ्यात फासून कुटुंबांला सहभागी करुन घेत लग्नगाठ बांधायची. दोन-आठ दिवस संसार करायचा आणि पळून जात पुन्हा दुसऱ्या तरुणांला फसवत त्याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे चार-चौघात लग्न करायचे. अशा घटना चित्रपटांमध्ये घडत असल्या तरी शहादा तालुक्यात असाच एक प्रकार समोर आला आहे.
मंदाणा येथे एका तरुणाची फसवणूक करुन अवघ्या १५ दिवसांतच दुसऱ्यासोबत लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असताना सदर टोळीचा पर्दाफाश शहादा पोलिसांनी केलाय. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या नवविवाहितेसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून तिघे फरार झाले आहेत. सोनू शिंदे (रा.हिंगोली) असे या तरुणीचे नाव आहे. तिने आतापर्यंत १३ मुलांना लग्न करून फसवलेय.
नेमके काय झाले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मंदाणे येथील भूषण संतोष सैंदाणे या युवकास बाबाराव देवराव आंबले (रा.औरंगाबाद) याने ५ मे रोजी लग्नासाठी एक मुलगी दाखवली. भूषणला मुलगी आवडल्यानंतर दि.६ मे रोजी मंदाणे येथे त्याचा सोनू राजू शिंदे या मुलीशी विवाह पार पडला. सदर लग्न कार्यासाठी भूषणच्या परिवाराने आंबले व मुलीच्या नातेवाईकांना एक लाख ३० हजार रुपये रोख रक्कम दिली होती. विवाह संपन्न झाल्यानंतर पत्नी सोनू ही १४ मेपर्यंत मंदाणे येथे राहिली. मात्र १५ मे रोजी पहाटे ती घरातून कोणालाही काही न सांगता अज्ञातस्थळी निघून गेली.
दुसरे लग्न करताना प्रकार उघडकीस
दरम्यानच्या कालावधीत भूषणने पत्नी सोनू हिच्या आई-वडिलांसह भावाला व नातेवाईकांना सोनू हरवल्याची माहिती दिली. सर्वत्र शोधाशोध सुरू असताना २१ मे रोजी भूषणच्या नातेवाईकांनी सांगितले की तुझ्या पत्नीसारख्या दिसणाऱ्या मुलीचे लग्न बेटावद (ता.शिंदखेडा) येथील कपिलेश्वर मंदिरावर सुरू आहे. याबाबत नातेवाईकाने सदर विवाहितेचा फोटो टाकल्यानंतर ती युवती ही सोनू असल्याची खात्री झाल्यानंतर भूषणने पोलिसांना कळवले. पण बेटावद येथे विवाह सोहळा संपन्न झाला असून वऱ्हाडी हे पडावद येथे जेवण करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. तेथे पाच जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.
दुसऱ्या वरालाही गंडवले
कारवाई केल्यानंतर पोलीसांनी अधिक चौकशी केली असता सोनूच्या नातेवाईकांनी २१ मे रोजी सुरत येथील माणिक पाटील या युवकाशी तिचे बेटावद येथे लग्न लावून दिले व या विवाहासाठी ५० हजार रुपये रोख रक्कम घेतली असून विवाह संपन्न झाल्यानंतर दीड लाख रुपये घेणार असल्याची माहिती माणिक पाटील यांच्या परिवाराने दिल्यानंतर भूषण याने पत्नी पूजा व तिच्या नातेवाईकांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार शहादा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर शहादा पोलिसांनी या प्रकरणी ५ संशयितांना अटक केली आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी विवाहीता सोनू, तिची आई वंदना राजू शिंदे (रा.हिंगोली), रविंद्र गैभू गोपाळ (रा.कुंभारी ता.जामनेर), योगेश संजय साठे (रा.अकोला), प्रीती राजेश कांबळे (रा. हिंगोली) अशा पाच जणांना अटक केली आहे तर या टोळीतील बाबाराव देवराव आंबले, नवरी युवती सोनूचा भाऊ भैरव राजू शिंदे व पूजा प्रकाश साळवे सर्व (रा. हिंगोली) हे तिघे जण फरार झालेत.
तरुणांशी लग्न करुन फसवणूक करणाऱ्या टोळीने गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यात केल्या आहेत. पैसे घेऊन लग्न करायचे लग्नानंतर काही दिवसांनी विवाहितेने पळून जायचे व अगदी कमी कालावधीत नवीन लग्न लावायचे असे उद्योग या टोळीचे सुरू होते.
महत्वाच्या बातम्या
- १ जून नंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार ? आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती…
- मोठी बातमी! बांग्लादेश दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव
- अफरीदीची मुलगी अडकणार लग्नबंधनात ; जावई आणि मुलीच्या नात्याबद्दल केला खुलासा
- ‘पति पत्नी और वो’ ; धनश्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
- बीसीसीआयच्या वार्षिक करारातील महिला आणि पुरुष मानधनातील तफावत; स्मीती मंधानाने मांडले मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

