मुंबई : गोव्यात निवडणुका आल्या की नवे पक्ष, नव्या आघाड्या स्थापन होतात, स्वत:चे दोनेक आमदार निवडणून आणतात व जे सरकार स्थापन होईल त्यांच्यात सामील होऊन स्वत:चे उखळ पांढरे करुन घेतात. यात गोव्याचे नुकसानच झाले आहे. या प्रकारामुळे गोव्यातील जनतेतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे, असे संजय आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हणाले.
गोव्यातील उद्याच्या निवडणुकीत तरी हे चित्र बदलावे, अल्बुकर्कने गोवा जिंकले व ४५० वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखाली ठेवले. गोव्याचे रीाजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार आहेत. गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा असे कुणालाच का वाटू नये? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पुढे राऊत लिहीतात, गोव्यात पर्यटक खूप येतात. सध्या धावत्या पर्यटनाची एक नवी फॅशन निघाली आहे. गोवा आकाराने लहान आहे. म्हणून एका दिवसात गोवा पाहून अनेक लोक परत जातात. काही लोक गोव्यात खास करमणूक नाही, दोन दिवसांतच कंटाळा आला, असे सांगून परत जातात. त्या सर्वांनी निवडणूक मोसमात गोव्यात यायला हवे व मनोरंजनाचा आनंद घ्यायला हवा असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे.
गोव्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यामुळे राजकीय पर्यटनाचा ओघ वाढला आहे. बेडूकही ‘डराव डराव’ करु लागले आहेत व इकडून तिकडे उड्या मारू लागले आहेत. हे सर्व बेडूक उड्या मारताना राजकीय तत्त्वे, नीतिमत्ता याबाबत डराव डराव करतात, पण त्यामागे ‘सत्ता’ हेच एकमेव सूत्र आहे.
गोव्यात रोजगाराचा प्रश्न भेडसावतो आहे. कोरोनामुळे पर्यटनावर संकट कोसळले व अर्थकारण बिघडले. लोकांच्या चुली थंडावल्या आहेत. त्याच वेळी अमली पदार्थाने अनेक गावांना, समुद्रकिनाऱ्यांना विळखा घातला आहे. कॅसिनो जुगाराच्या बोटी सरकारला खंडणी देतात. त्या खंडणीवर गोव्यासारखे देवांचे राज्य चालवले जात असेल तर तो हिंदुत्वाचा अपमानच म्हणावा लागेल. कॅसिनो जुगाराविरुद्ध लढा देऊन मनोहर पर्रीकरांनी भाजपला गोव्याला रुजवले. तेच भाजप सरकार आज कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहे.
जुगाराची चटक लावलेल्या गोव्याला स्वयंपूर्ण कसे बनविणार?
आता मुख्यमंत्री सावंत सांगताहेत, गोव्यातील प्रत्येक गाव म्हणे स्वयंपूर्ण करणार. तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावून, जुगाराची चटक लावून तुम्ही गोव्याला स्वयंपूर्ण कसे काय बनविणार ते सांगा. गोव्यातील मुली सुरक्षित नाहीत. सिद्धी नाईक प्रकरण संपलेले नाही व कलंगुट समुद्रकिनाऱ्यावर ज्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. राजकारण्यांना गोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय? गोव्याच्या राजकारणात कोण कोठे जाईल व कोणाच्या गळास कोणता मासा लागेल याचा भरवसा नाही.
गोव्यातील लोकांना भाजप हिंदूंचा तारणहार वाटत असेल तर ते चूक
काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हे गोव्याच्या मातीतले मूळ पक्ष, पण भाऊसाहेब बांदोडकरांसारखा नेता राहिला नाही व त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षाचे अस्तित्वही उरले नाही. मगो पक्ष भाजपने गिळून ढेकर देऊन पचवला आहे. याला जबाबदार ‘मगो’चे सध्याचे नेतृत्वच आहे. गोव्यातील लोकांना भाजप हा हिंदूंचा तारणहार असा पक्ष वाटत असेल तर ते चूक आहे.
जुगारी व्यवसायातून राजकीय देणग्या
भाजपच्या आमदारांच्या यादीवर नजर टाकली तर आम्ही काय सांगतोय ते कळेल. भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा आहे. देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे, पण गोव्यात हवे तितके ‘बीफ’ म्हणजे गोमांस मिळत आहे, हे ढोंग नाही तर काय? पंतप्रधान मोदी यांना जुगाराचा राग आहे, पण गोव्याच्या समुद्रातील कॅसिनो जुगाराच्या बोटी मंत्र्यांचे खिसे भरत आहेत. या जुगारी व्यवसायातून राजकीय पक्षांना देणग्या मिळतात व निवडणुका लढवल्या जातात. पोर्तुगीजांविरुद्ध लढलेला गोवा या नव्या वसाहतवाद्यांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. अशी टीकाही राऊतांनी भाजपावर केली.
- मराठवाड्यात पावसाचा धुमाकुळ, जायकवाडी ९२ टक्के भरले, ११ वाजता दरवाजे उघडणार
- मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, प्रचंड नुकसान; वडेट्टीवारांनी केंद्राकडे केली महत्वाची मागणी
- ‘ईडीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी मात्र कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही’
- भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी
- ८ तासांच्या चौकशीनंतर मंत्री अनिल परब ईडी कार्यालयाच्या बाहेर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

