नवी दिल्ली : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशने तब्बल ३५७ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठून महाराष्ट्राला ६ गडी राखून पराभूत केले. या विजयासह उत्तर प्रदेशने ग- गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर महाराष्ट्राबरोबरच विदर्भावरही साखळीतच गाशा गुंडाळण्याची नामुश्की ओढवली.
महाराष्ट्राने दुसरा डाव ५ बाद २११ धावांवर घोषित केला. राहुल त्रिपाठीने ११० चेंडूंत नाबाद १२३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे पहिल्या डावात आघाडी मिळवणाऱ्या महाराष्ट्राने उत्तर प्रदेशसमोर विजयासाठी ७३ षटकांत ३५७ धावांचे लक्ष्य ठेवले.
उत्तर प्रदेशने या मोठ्या आव्हानाचा पाठलाग ७०.१ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात पार केला. कर्णधार कर्ण शर्मा ११६ आणि सलामीवीर अल्मस शौकात १०० यांनी शतके झळकावून उत्तर प्रदेशच्या विजयाचे तोरण बांधले. पहिल्या डावातील अर्धशतकवीर रिंकू सिंगने अवघ्या ६० चेंडूंत नाबाद ७८ धावांची झंझावाती खेळी साकारून उत्तर प्रदेशला विजय मिळवून दिला.
उत्तर प्रदेशने तीन सामन्यांतील १३ गुणांसह तालिकेत अग्रस्थान गाठले आहे. तर महाराष्ट्राला ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
ग-गटातील अन्य सामन्यात विदर्भाने आसामवर पाच गडी राखून विजय मिळवला. परंतु सर्व गटविजेत्यांसह दुसऱ्या स्थानावरील एकच सर्वोत्तम संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार होता. त्यामुळे अ-गटातील केरळने १३ गुण मिळवून दुसऱ्या स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला. तर विदर्भाचे १२ गुण होते. त्यांना १ गुण कमी असल्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
धावफलक :
महाराष्ट्र – पहिला डाव : ४६२
उत्तर प्रदेश – पहिला डाव : ३१७
महाराष्ट्र – दुसरा डाव : ५ बाद २११ घोषित
उत्तर प्रदेश – दुसरा डाव : ७०.१ षटकांत ४ बाद ३५९
सामनावीर : रिंकू सिंग
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

