पुणे: काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. परंतु आज दुपारी या पुतळ्याचा मेघडंबरीचा काही भाग कोसळून पडला. ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनी निदर्शनास आणून या घटनेचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख आणि काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी या घटनेबद्दल भाजप सरकारचा तीव्र निषेध केला असून या गोष्टीबद्दल कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा घाई गडबडी मध्ये बसवण्यात आला आहे. त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन अमित शहा यांच्या हस्ते झाले होते आणि त्यानंतर अडीच ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन देखील झाले. परंतु या कार्यक्रमाला काही तास होत नाहीत. तोवरच क्रेनच्या मदतीने साहित्य खाली घेताना, मेघडांबरीचा पुढील काही भाग पडला आहे. यावरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काल मेट्रोच्या काचांना तडे, आज पुतळ्याचा काही भाग कोसळला..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. पुण्यासोबत पिंपरी-चिंचवडच्या मेट्रोचेही आज मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. उद्घाटनांतर पुणेकरांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. सहा मार्चला दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. तसेच सोमवारपासून पुणेकरांना दररोज सकाळी आठ ते रात्री नऊदरम्यान मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पिंपरी ते फुगेवाडी येथील मेट्रोच्या दोन कोचच्या काचांना तडे गेल्याचे समोर आले आहे.
ही बाब मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या लक्ष्यात आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण नंतर त्यांनी हा देखभालीचा भाग असल्याचे सांगितले. त्यामुळे आता मेट्रो सुरू करण्यास एवढी घाई करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

