सोलापूर – राज्यात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी पोटच्या मुलासारखी वाढवलेली पिके या पावसात वाहून गेली आहेत. गेल्यावर्षी देखील अशीच अतिवृष्टी झाली होती त्याची सरकारकडून मदत अजून कित्येकांना मिळाली नसताना आता निसर्गाच्या कोपाचा सामना बळीराजाला करावं लागत आहे. मात्र जगाच्या पोशिंद्यावर आलेले हे संकट राजकीय नेत्यांना मात्र दिसत आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे.
एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने हैराण झालेला असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री जयंत पाटील हे पुष्पवृष्टीने स्वागत करून घेत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राष्ट्रवादीचे नेते मात्र पक्षाचे कार्यकम धुमधडाक्यात करत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अश्याप्रकारे असंवेदनशील वागण्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.
जयंत पाटील मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी परळीमध्ये पाटलांचं फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आलं. स्वागताचा कार्यक्रम एवढा मोठा आणि भव्यदिव्य झाला की यावेळी बोलताना माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या या बेजबाबदार वागण्यावर स्वभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार हल्ला चढवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल म्हणाले,आज राज्यात मराठवाडा,विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू आहे.. मराठवाड्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे.. सर्व धरणांनी धोक्याची रेषा ओलांडली असुन जिकडेतिकडे सर्वत्र पाणी आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कपाशी पुर्णपणे हातुन गेलं आहे.. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे..
आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसोबतच डोळ्यांमध्येही पाणी आहे.. अश्रुंनी भरलेले डोळे घराघरात दिसतील.. मात्र मराठवाडयात परळीत काल एका कार्यक्रमात राज्याचे मातब्बर अन् सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा संवाद कार्यक्रम पाहिला तिथलं त्यांचं जंगी स्वागत.. तो रूबाब आणि तो अफाट खर्च,मिरवणूक, हारतुरे सगळंच कसं टेचात..
राज्यात स्वतःची सुसंस्कृत जबाबदार व संवेदनशील नेता म्हणुन स्वतः वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जयंतरावांना काल सत्कार अन् हारतुरे यांच्या डौलाच्या धुंदीत त्याच मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीने झालेली दैना दिसली नसेल का.. सत्तेची धुंदी इतकीही डोक्यात जाऊ द्यायची नसते मंत्री महोदय.. आपण राज्यात एक संवेदनशील नेतृत्व म्हणुन आपले कार्यकर्ते राज्यभर ऊर बडवुन सांगतात आणि तिच संवेदनशीलता तुम्ही आपल्या सत्तेच्या अन् पदाच्या रुबाबात पायदळी तुडवता.. जयंतराव, निदान लोकांना मदत देणं जमणार नसेल तर त्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळु नकात..
आज होत असलेल्या नुकसानीचं मोल हे अगणित प्रमाणात आहे.. घरंदारं उध्वस्त होत आहेत.. शेतकऱ्यांना शेवटी सरकारी मदतीशिवाय पर्याय नाही.. मदत मिळेल ही सरकारकडून पण तिथ त्यांच्याच भागात जावुन त्यांच्याच समोर तुम्ही आपलाच उदोउदो करत तिथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचे मूल्य मातीमोल करु नका अन्यथा इथला शेतकरी देखील मागच्यांप्रमाणे तुमचा देखील ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याशिवाय राहणार नाही असं बागल यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह तरुणाला पडला चांगलाच महागात
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- रिषभचं ‘गली क्रिकेट’ कार्तिकवर पडलं असतं भारी; थोडक्यात बचावला खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

