नाशिक : अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर रात्री उशिरा पडदा पडला.
तर गुन्हे दाखल असलेल्या नाशिक आणि पुणे पोलिसांनीही राणे यांचा ताबा मागितला नाही. परंतू नाशिक पोलिसातही गुन्हा दाखल असल्याने, त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानुसार २ सप्टेंबरला नारायण राणे यांना नाशिक पोलिसांत हजेरी लावायची आहे. याबाबत आज बुधवारी नाशिक पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
आयुक्त पांडे म्हणाले की, सायबर पोलीस स्टेशन नाशिकमध्ये गुन्हा नोंद झाला होता. त्यासंदर्भात नारायण राणे यांना रत्नागिरी संगमेश्वरमध्ये अटक झाली. त्यानंतर रायगड पोलीस ताब्यात घेऊन गेले. महाड येथे गुन्हा दाखल झाल्याने कोर्टात दाखल केले. सुनावणी काल उशिरापर्यंत चालली. न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी अटकेची भूमिका बदलली. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना दोन सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या आत पोलिसात येऊन जबाब नोंदवण्याची विनंती केली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. अशी अपेक्षा आहे माननीय मंत्रिमहोदय २ सप्टेंबरला येतील आणि तपास प्रक्रियेत सहभागी होतील.
नारायण राणेंना जामीन हा महाड कोर्टाकडून त्या खटल्यात मिळाला आहे. आमच्या केसमध्ये अजून अटकेची कारवाई झालेली नाही. आम्ही फक्त २ सप्टेंबरला हजर राहून तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी ती स्वीकारले आहे. मी या कारवाईबाबत समाधानी आहे, असंही दीपककुमार पांडे यांनी नमूद केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व गुन्हे रद्द करण्यासाठी नारायण राणे हायकोर्टाची पायरी चढणार
- ‘अशा धमक्यांना मी घाबरत नाही, जशास तसं उत्तर देईन!’- प्रसाद लाड
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी


