पुणे : जातीयवादातून होणारा अन्याय थांबविण्यासाठी, देशहितासाठी भीमा कोरेगाव येथे दोनशे वर्षांपूर्वी पेशव्यांचा खात्मा केला. त्या शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभाला आज दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. क्रांतिकारक विचारांची प्रेरणा देणाऱ्या या विजयस्तंभाच्या परिसरात, भीमा कोरेगावात भव्य स्मारक उभारणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
भारतीय रिपब्लिकेशन पक्षाच्या (आठवले गट) वतीने भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या द्विशताब्दीनिमित्त आयोजित भव्य अभिवादन सभेत रामदास आठवले मार्गदर्शन करीत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यसभा खासदार अमर साबळे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, सरचिटणीस राजाभाऊ सरोदे, आरपीआय नेते परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, बाळासाहेब जानराव, सूर्यकांत वाघमारे, भूपेंद्र थुलकर, काकासाहेब कंबळकर, तानसेन ननावरे, हनुमंत साठे, शैलेंद्र चव्हाण, असित गांगुर्डे, संजय सोनावणे, चंद्रकांता सोनकांबळे, मुकेश शहारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीलाही रामदास आठवले यांनी भेट देऊन समाधी स्थळाची पाहणी केली.

रामदास आठवले म्हणाले, दोनशे वर्षानंतरही दलितांवरील अत्याचार पूर्णपणे थांबलेले नाहीत. संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार सन्मानाने करणाऱ्या गोविंद गायकवाड यांची समाधी तोडली जाते, हे दुर्दैवी आहे. मराठा समाजाने समंजस भूमिका घ्यायला हवी. दलित, मराठा, बहुजन, अल्पसंख्याक समाजाने एकत्र आले पाहिजे. सध्याचे सरकार हे दलितांच्या किंवा बाबासाहेबांच्या विरोधात नाही. संविधान बदलण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर आम्ही केंद्रात सक्षमपणे विरोध करु.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला वंदनीय मानतात. त्यामुळे अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहू नये. हे सरकार आणि नरेंद्र मोदी मनुस्मृतीच्या नाहीतर, भीमस्मृतीच्या मार्गावर चालत आहेत. इंदू मिलच्या जागेवर स्मारक, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर आदी गोष्टीतून हे सिद्ध होत आहे. त्यामुळे आंबेडकरवादी जनतेने गटातटाचे राजकारण सोडून एका छताखाली आले पाहिजे. रिपब्लिकन ऐक्य झाल्यास अध्यक्ष कोणीही व्हावे, मी त्यामध्ये जायला तयार आहे. परंतु, दलित समाजाच्या उत्थानासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, असेही आठवले यांनी नमूद केले.

अमर साबळे म्हणाले, गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वाहिलेले हे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. वढू येथे समाजकंटकांनी संभाजी महाराजांच्या अंत्यविधी करणाऱ्या गोविंद गायकवाड यांच्या समाधीची मोडतोड दुर्दैवी आहे. आता त्याठिकाणी माझ्या खासदार निधीतून गायकवाड यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करणार आहे. हे सरकार आपले असून, आठवले साहेबांचा सूचनेचा विचार होतो. त्यामुळे आपण सर्वानी आठवले यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

