🕒 1 min read
औरंगाबाद : पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. हळूहळू आधुनिकतेच्या नावाखाली स्वतंत्र कुटुंब पद्धती विकसित झाली. माणसं फक्त स्वत:चा विचार करु लागली, स्वतःसाठी जगू लागली. क्षणिक सुखे, क्षणिक आनंदाच्या मागे धावतांना कुटुंबातील विसंवाद वाढला, प्रेम, जिव्हाळा हरवला. त्यातच सततच्या वादविवादातून प्रा. राजन शिंदे खून प्रकरणासारख्या घटना होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. त्यासोबतच यावर एकमेव उपाय म्हणजे कुटुंबाला वेळ देणे आणि एकमेकांना समजून घेणे असल्याचे तज्ञांनी सांगितले. शहरातील बहुचर्चित राजन शिंदे खून प्रकरणाचा सोमवारी अखेर उलगडा झाला. अल्पवयीन मुलानेच खून केल्याची कबुली दिली आहे. सद्यपरिस्थितीत यांसारख्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. याबाबत मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधून याबाबत जाणून घेतले.
तंत्रज्ञानाने आईवडिलांना मुलांपासून दुरावले – डॉ. मोनाली देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ
माणूस आयुष्य जगतांना दोन प्रकारचे आयुष्य जगतो. एक स्वतःसाठी आणि एक इतरांसाठी. मात्र सध्याच्या काळात इतरांसाठी आयुष्य जगणारी, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या कामाला येणारी माणसं कमी होतांना दिसून येत आहे. याला काही कारणं आहेत. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती नांदत होती. हळूहळू ही पद्धती लोप पावत गेली. समाजात, आपल्यांमध्ये रमणारी माणसे एकटे राहण्याला प्राधान्य देऊ लागली.
सध्याच्या काळात अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया, वेगवेगळ्या प्रकारची भयानक व्हिडिओ गेम्स यांचा वापर वाढला आहे. मात्र याला कारणेही तशीच आहेत. आईवडिलांना स्वतःच आयुष्य मनमुरादपणे जगायचंय अशावेळी मुलांना सोयीसुविधा पुरवल्या म्हणजे आपले काम संपले असा समज रुढ होत आहे. तर मुलेही स्वत:च्या तंत्रज्ञानाच्या जगात जास्त खुश आहेत. यातूनच आई वडिल आणि मुलांमध्ये टोकाचा विसंवाद वाढून वादविवादाच्या घटनांचे रुपांतर खूनापर्यंत होतांना दिसून येत आहे.
कुटुंबात एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे महत्वाचे – डॉ. विक्रांत पाटणकर, मनोविकारतज्ज्ञ
आजच्या तरुणाईमध्ये आपल्याला होणारा त्रास कसा थांबवता येईल? त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. आणि याच मानसिकतेतून खून करण्यापर्यंत तरुणांची मजल जात आहे. व्यसने माणसाच्या जाणिवा संपवतात. कुठलेही कृत्य करेपर्यंत हे कृत्य किती भयंकर आहे, त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात. याची कुठलीही जाणीव ते कृत्य करणाऱ्या व्यक्तीला नसते. सध्या वेब सिरीज हा खून करण्याचा मुख्य आधार ठरत आहे.
सध्या आपण पाहत असलेल्या अनेक वेब सिरीजला सेन्सॉर बोर्ड नाही. याचा परिणाम खून कसा करायचा, त्याच्या क्लुप्त्या या वेब सिरीज मधून तरुणांना मिळतात. अतिशय महत्त्वाचे म्हणजे कुटुंबामध्ये एकमेकांना वेळ देणे, एकमेकांना समजून घेणे आपसातले कुठलेही मतभेद असो ते शेअर केल्याने नक्कीच समस्या काही प्रमाणात सुटू शकते. जेणेकरून कुठल्याही सदस्याची एवढ्या टोकापर्यंत जाण्याची मजल होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- काय फालतूपणा…! राज्यसरकारच्या ‘त्या’ निर्णयावर आरोह वेलणकर भडकला
- ‘आता हा घोटाळा उघड करा’; संजय राऊतांचं सोमय्यांना ओपन चॅलेंज
- ‘मोदी सरकारचे १०० कोटी आणि ठाकरे सरकारचे १०० कोटी किती फरक आहे पाहा’
- रितेश देशमुख सुध्दा झाला होता बेरोजगार; धक्कादायक खुलासा…!
- आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं ठाकरे सरकार घोटलोंकी सरकार- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

