औरंगाबाद : मराठवाडा जनता विकास परिषदेचे तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विकास संशोधन संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे शुक्रवारी रात्री उशीरा अल्पशा अजाराने औरंगाबाद येथे निधन झाले, ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी तसेच सून जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. मराठवाडा विकास चळवळीत आरंभापासून सक्रीय सहभाग नोंदवणारे डॉ. अदवंत यांनी अनेक सामाजिक संस्था-संघटनांमधून आपले योगदान दिले. स्व.पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. ना.वि. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार दशकांहून अधिक काळ विकास चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला, अजूनही त्यांचे कार्य सुरू होते.
मूळ पैठण तालुक्यातील डॉ.अदवंत एमएसस्सी पीएचडी होते. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापन केले. १९८५ ते २००३ पर्यंत प्राचार्यपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. कुशल प्रशासन आणि निरपेक्ष भावनेने त्यांनी आपले स्थान निर्माण केले. शैक्षणिक क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या या काळात त्यांनी सांभाळल्या. प्राचार्य महासंघाचे अध्यक्षपदीही कार्य केले. विद्यापीठात सिनेट सदस्य, तसेच नॅक कमिटी सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पूर्ण केली होती. ‘उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन’ यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष सेल स्थापन केला होता, या सेलचे सदस्य म्हणून सरांनी काम करत राज्य भरात सहा कार्यशाळा आयोजित करुन शासनाला अहवाल सादर केला, गुणवत्तावाढीच्या उपक्रमाला दिशा दिली. मराठवाड्यात सर्वत्र आणि महाराष्ट्रात अनेक शैक्षणीक संस्थांमधून डॉ. अदवंत यांनी शैक्षणीक नेतृत्त्व, मराठवाड्यातील शैक्षणीक सुविधा आणि प्रश्न अशा विषयावर सातत्याने परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करुन शैक्षणीक चळवळ उभी केली होती.
जर्नल्स तथा अनेक दैनिकांमधून नियमीतपणे शिक्षण, पर्यावरण, मागासप्रदेश विकास या विषयांवर लिखाण केले. तर अमरावती, नागपूर, औरंगाबाद विद्यापीठांमधून तसेच महाविद्यालयांमधून तज्ज्ञ सल्लागार-मार्गदर्शक म्हणून काम केले. डॉ. अदवंत यांनी सहा विविध पुस्तकांचे लेखन आणि सपादन केले होते.
निवृत्तीनंतरच्या काळात सरांनी पूर्णवेळ सामाजिक संघटना-संस्थांमधून स्वत:ला व्यस्त केले होते. आपल्या व्यवस्थापन आणि संघटनाच्या कुशलतेचा समाजाला उपयोग होईल यादृष्टीने अंतीम क्षणापर्यंत काम केले. मराठवाडा विकास-अनुशेष आणि मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासह सर्वांगीण प्रश्नांवर अभ्यास आणि अधिकार वाणी यामुळे सरांच्या नियमित मार्गदर्शनात राजकीय-सामाजिक कार्यकर्ते काम करत होते. स्व.गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रेरणेने डॉ.अदवंत यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेत विविध पदांची जबाबदारी सांभाळली होती तसेच सध्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सचिवपदी कार्यरत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- चाहत्यांना आश्चर्याचा धक्का रश्मिका चालावतीय शेतात नांगर पहा व्हिडीओ


