औरंगाबाद : एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.
दानवेंच्या या वक्तव्यानंतर शेतकरी नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. देशातील शेतकऱ्यांना खलिस्तान, पाकिस्तान आणि चीन यांची फूस असल्याचा आरोप करुन शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेवून मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसने देखील केली आहे.
आता, दानवेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन अवलंबलं आहे. औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. गेल्या 24 तासापासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवेंच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
‘केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. त्यांनी दिलेल्या वेळेत माफी मागितली नाही तर आम्ही पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु,’ असा आक्रमक इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, दानवेंचे जावई व कट्टर राजकीय विरोधक असलेले हर्षवर्धन जाधव यांनी देखील या कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांचं समर्थन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरलं; ममता बॅनर्जी सूडाच्या भावनेने काम करत आहेत : राज्यपाल
- महिलेला राज्यचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर कौतुकच – पंकजा मुंडे
- ‘त्या’ खासदारांचा काय अभ्यास? भुजबळांचा उदयनराजेंना अप्रत्यक्ष टोला
- राजस्थानमध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ; मित्रपक्षाने सरकारचा पाठिंबा काढला
- मराठी तरुणांना रोजगाराची संधी, ठाकरे सरकारच्या ‘या’ नव्या योजनेतून ‘असे’ मिळवा अनुदान !


