🕒 1 min read
मुंबई : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’पंतप्रधान मोदी दोन दिवसांपूर्वी पंजाबमधील फिरोजपूर येथे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी आले, पण त्यांचा ताफा रस्त्यावरील उड्डाणपुलावर शेतकऱ्यांच्या एका गटाने अडवल्याने मोदी अचानक दौरा सोडून माघारी परतले हे उपकथानक समोर आले आहे. उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा पंधरा-वीस मिनिटे थांबला. निदर्शकांनी रस्ता रोखल्यामुळे हे घडले असे सांगितले गेले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत या त्रुटी आहेत असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. या विषयावर आता भलतेच राजकारण सुरू झाले आहे व त्यात देवादिकांनाही ओढण्यात आले आहे. आपल्या पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. जगातील दहा सर्वोच्च नेत्यांच्या तोडीची सुरक्षा व्यवस्था पंतप्रधान मोदी यांना लाभली आहे. सुरक्षेसाठी एसपीजी कमांडोंचे कवच आहेच, पण नुकतीच १२ कोटींची मेबॅक-बुलेटप्रूफ गाडीही त्यांच्या ताफ्यात सामील झाली आहे. त्यामुळे आपल्या पंतप्रधानांचा बालही बाका होणार नाही. हे सत्य असले तरी पंतप्रधानांचा ताफा रस्त्यावर अडवणे, आंदोलकांनी रस्ता रोखणे याचे समर्थन कोणी करू नये.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’पंजाबमधील शेतकरी दीड वर्षापासून तीन कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करीत होता व शेवटी पंतप्रधानांना माघार घ्यावी लागली. तरी शेतकऱयांचे प्रश्न संपलेले नाहीत. शेतकऱयांना त्यांचे प्रश्न लोकशाही मार्गाने मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे व पंजाबसारख्या राज्यात हे स्वातंत्र्य जरा जास्त आहे. पंतप्रधान येणार म्हणून आपल्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी जिल्हा तसेच तहसील कार्यालयांवर आंदोलने करून निवेदने देणार होते. प्रत्यक्ष पंतप्रधानांचा रस्ता अडवून गोंधळ घालण्याची कोणतीच योजना नव्हती. जे घडले त्यामागे दुसरेच कोणीतरी काम करीत आहे असे आता संयुक्त किसान मोर्चातर्फे सांगण्यात आले. सखोल आणि निष्पक्ष चौकशी करा अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे’, असेही राऊत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- ‘महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे’; नाना पटोलेंचे वक्तव्य
- सारा तेंडुलकर आणि शुभमन गील रिलेशनशिपमध्ये?; ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण
- ‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’; नाना पटोलेंचा हल्लाबोल
- दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
