🕒 1 min read
मुंबई : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’देशाचे नेतृत्व करणाऱ्या अनेकांना कधी ना कधी धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागलेच आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबतीत पंजाबात जे घडले ते चिंताजनक, तितकेच धक्कादायक आहे. देवाच्या कृपेने मोदी सुखरूप परत आले म्हणून देवांचे आभार. तरीही पंजाबातील सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. आम्ही तर म्हणतो, विषय देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीचा असल्यामुळे संयुक्त संसदीय समिती स्थापन करून या प्रकाराची चौकशी व्हायला हवी. म्हणजे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. पुलवामा ते पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा चिंतेचाच विषय आहे. आम्ही मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य चिंतितो.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणावरून देशात गोंधळाचे, तितकेच गमतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी, कार्यकर्त्यांनी जागोजागी पूजाअर्चा, महामृत्युंजय जप, यज्ञ, महाआरत्यांचे आयोजन सुरू केले आहे. लोकांनी घरात व बाहेर धूप, आरत्या वगैरे करून पंतप्रधानांच्या सुरक्षित दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. मोदी यांना सुरक्षित जीवन लाभावे यासाठी उत्तर प्रदेश, आसामचे मुख्यमंत्री मंदिरात पूजेला बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. एकंदरीत संपूर्ण देशच अशा पद्धतीने ईश्वरपूजेत मग्न झाल्याने आपण सगळेच अध्यात्माच्या शेवटच्या बिंदूला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व कशासाठी, तर पंजाबात पंतप्रधान मोदी यांच्या जिवावरच बेतले होते, पण देवाच्या कृपेने ते वाचले म्हणून. मोदी यांच्याभोवती असलेले अभेद्य सुरक्षा कवच, प्रशिक्षित एसपीजी कमांडो, प्रचंड सुरक्षा दल, अत्याधुनिक बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्या-घोडे यामुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले व पंजाबातून सुखरूप दिल्लीस परत आले. त्यामुळे नवीन वर्षात त्यांच्या सुरक्षेवरून देवदिवाळी सुरू केली आहे, पण मुळात घडले काय, घडले कसे व जे घडले त्यास जबाबदार कोण याचा थांगपत्ता लागणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या बाबतीत साप समजून भुई धोपटणे हा प्रकार योग्य नाही व त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील फटी व चिरा कधीच बुजवता येणार नाहीत’, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपावर काँग्रेसचा टोमणा, “तो सीन पीएमओच्या स्क्रिप्टमध्ये नव्हता”
- ‘महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे’; नाना पटोलेंचे वक्तव्य
- सारा तेंडुलकर आणि शुभमन गील रिलेशनशिपमध्ये?; ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण
- ‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’; नाना पटोलेंचा हल्लाबोल
- दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
