मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. पुढे हे तौत्के चक्रीवादळ सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये धडकले. गुजरातमध्ये वादळामुळे १६ हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ४० हजार झाडे आणि १० हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत.
दरम्यान, या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, पंतप्रधानांनी गुजरातसाठी 1 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. गुजरात सुद्धा भारताचा भाग आहे. तिथे देखील नुकसान झाला आहे. तसंच पंतप्रधानांचं संपूर्ण देशावर लक्ष आहे. त्यामुळे त्यांचं विमान महाराष्ट्राकडेही वळेल, असं संजय राऊत म्हणाले.
‘गुजरातला जर एक हजार कोटींची मदत दिली असेल तर महाराष्ट्राला त्यांचं वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण पंतप्रधान लवकरच गोव्याला 500 कोटी रुपये मदत जाहीर करतील. कारण गोव्यातही मोठं नुकसान झालं आहे. तसंच महाराष्ट्राला बसलेला फटका पाहता पंतप्रधान महाराष्ट्राला दीड हजार कोटींची मदत जाहीर करतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
- ‘जलयुक्त शिवारात’ बोगसगिरी, सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालकासह ६ जणांवर परळीत गुन्हा
- मराठा आरक्षणासाठी आक्रोश मोर्चाला बीडपासून सुरुवात


