बीड : गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने २४ ते ७२ तासांत तक्रार न केल्याचा नियम दाखवत पीक विमा नाकारला होता. जिल्ह्यात या प्रश्नावर शेतकरी संघटना व नेते आक्रमक झाले आहेत. यामुळे शेतकरी नेते गंगाभीषण थावरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.
गतवर्षी जिल्ह्यातील १८ लाख शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे पीक विमा भरला होता. शेतकऱ्यांचा हिस्सा सुमारे ६३ कोटी होता तर राज्य व केंद्र शासन मिळून एकूण ७०० कोटींपेक्षा अधिक रक्कम विमा कंपनीकडे भरण्यात आली होती. दरम्यान, गतवर्षी खरिपाच्या हंगामात ऐन पीक काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या अहवालानुसार ४ लाख शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना शासनाने थोडी आर्थिक मदतही केली. त्यामुळे नुकसान झाल्याने पीक विमा मिळेल असे शेतकऱ्यांना वाटले होते.
मात्र, प्रत्यक्षात कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी २४ ते ७२ तासांत ऑनलाइन तक्रार कंपनीकडे करावी, असा नियम केला. मात्र, पीक विमा भरताना या नियमाची माहिती शेतकऱ्यांना दिली गेली नव्हती. शिवाय, शेतकरी अडाणी असल्याने त्यांना ऑनलाइन तक्रार करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील केवळ २० हजार शेतकऱ्यांना १३ कोटींचा विमा देऊन कंपनीने हात झटकले व यामुळे पावणेचार लाख शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विमा कंपनीची ही बनवाबनवी व शेतकऱ्यांना विमा न मिळण्याची कारणे समोर आणली होती. यानंतर शेतकऱ्यांना खरा प्रकार कळला आणि जिल्ह्यात शेतकरी नेते आक्रमक झाले. शासन, प्रशासन दाद देत नसल्याचे पाहून शेतकरी नेते भाई थावरे यांनी विमा कंपनीच्या आकडेवारीच्या आधारे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
पीक विम्याच्या रकमेसाठी १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना घेराव
नुकसान भरपाईपोटी फक्त २० हजार शेतकऱ्यांनाच पीक विमा नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना विमा मिळावा, पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करावा, अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेराव घालण्यात येइल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजप आमचा कायमचा शत्रू नाहीये, भविष्यात काहीही होऊ शकते’, निलम गोऱ्हेंचे मोठे वक्तव्य
- फडणवीस आणि शेलारांची अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक, भेटीबाबत सस्पेन्स कायम
- ‘आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करा’, खा.गौतमची ‘गंभीर’ मागणी
- संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच; मनसेचं खुलं आव्हान !
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

