मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध 1 मेनंतर उठवले जातील का? असा प्रश्न विचारला जात असताना राज्यात दररोज 60 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
कारण, स्थिती अद्यापही पूर्ण आटोक्यात न आल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला जाईल असे संकेत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले आहेत. शिवाय आरोग्य यंत्रणांवरील ताण जैसे थे आहे. सध्या केंद्राने मदतीसाठी पुढाकार घेतल्यानंतर राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्यातील तुटवडा काहीसा कमी झाला असला तरी रुग्णालयांमध्ये अद्यापही बेड मिळत नाहीये. काही रुग्ण हे रुग्णालयात बेड मिळत नसल्याने तर काही रुग्णालयांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.
दरम्यान, लोक अजूनही बाहेर फिरत असून किमान १५ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केल्या आहेत. स्नेहा मरजाडी आणि नीलेश नवलखा यांनी रुग्णालयातील बेड्स, ऑक्सिजन, रेमदेसीवीर तुटवडा व अन्य काही प्रश्नांवरून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.
त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली. यावेळी, ‘किमान १५ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करा कारण सध्याच्या निर्बंधांनंतर आजही लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. यातून हेतू साध्य होणार नाही.अत्यंत अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर येण्याची परवानगी द्यावी. १५ दिवसांसाठी हा उपाय केला तर कोरोनाला अटकाव केला जाऊ शकतो,’ अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांनी शिल्लक सोयाबीन बियाणे इतरांना द्यावे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
- ‘युपी, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात परिस्थिती चांगली’, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया
- काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत विश्वजीत कदमांची महत्वाची माहिती !
- पोलिसांच्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा
- ‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा


