मुंबई : पुन्हा एकदा मेट्रो कारशेडचा प्रश्न तापला आहे. फडणवीस सरकारच्या याकाळात आरेमध्ये कारशेड करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र पर्यावरणप्रेमींसह स्थानिकांचा असलेला विरोध लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेतला.
ही जमीन केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असून सद्या हा प्रश्न उच्च न्यायालयात गेला आहे. उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली असून या प्रकल्पाचा खर्च वाढत आहे. तर, दुसरीकडं मेट्रोच्या कामास देखील विलंब होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून भाषण करताना भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘‘आरेमध्ये फक्त मुंबई मेट्रोच्या एका लाइनचं काम होणार होतं, पण कांजूरमध्ये मेट्रोच्या ३ लाइनचं काम होऊ शकतं. त्यामुळे केवळ एका लाइनसाठी मेट्रोचं कारशेड आरेमध्ये कशाला? आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे.’ असं ते म्हणाले.
दरम्यान, त्यांच्या या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. ‘महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा! कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच, ‘हा विषय प्रतिष्ठेचा नसून जेव्हा शरद पवार उच्चाधिकार समितीचा अहवाल वाचतील तेव्हा ते सुद्धा आरेमधील जमिनीचा विचार करतील. ते व्यावहारिक बाजू बघतात. त्यामुळे पवार साहेब अहवाल वाचल्यानंतर योग्य निर्णय घेतील,’ असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकांमधील आघाडीबाबत सुप्रिया सुळे म्हणतात…
- महाविकास आघाडीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस; जगतापांचा स्वबळाचा नारा तर गायकवाड म्हणतात…
- ‘मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ठाकरेंनी मोदींना फोन केला होता, मग कांजूरमार्गसाठी का करत नाहीत?’
- सर्वसामान्यांचा प्रवास होणार आणखी सुरक्षित; स्वस्त गाड्यांमध्येही असणार ‘ही’ सुविधा
- शाहिनबागसह शेतकरी आंदोलनात दिसणाऱ्या ‘त्या’ आज्जीवर कंगनाची टीका; आता आज्जीनं दिलं सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

