मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. माझ्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही घेवून जा, तुमचे दु:ख माझ्या पदरात टाका, आणि हसऱ्या चेहऱ्याने परत जिल्ह्यात जा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
मला दबावतंत्र करायचं नाही. मी काल दिल्लीला गेले होते. संघटनेच्या कामासाठी गेले होते. मला कुणीही झापलं नाही. अत्यंत सन्मानाची वागणूक पंतप्रधान मोदी, अध्यक्ष नड्डा यांच्याकडून मिळाली. कार्यकर्त्यांनी नाराजी दूर कराल असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. मोठा नेता नेहमीच त्याग करतो असंही त्या म्हणाल्या. जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
आपली शक्ती कमी करण्याचा डाव पूर्ण होऊ द्यायचा नाही. मला पुढे खडतर मार्ग दिसतो. पण आपण संघर्ष करत राहू, असं सांगतानाच योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत. सात्विक आहोत, असं त्या म्हणाल्या. मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे. मला अमूक पद हवं, तमूक पद हवं असं मी कधीच म्हटलं नाही. कधीच तशी मागणी केली नाही. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसवणं हे गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच माझा संघर्ष सुरू होता. त्यासाठीच त्यांच्या निधनानंतर मी संघर्ष यात्रा काढली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ, ईडीकडून चौकशी सत्र सुरूच
- नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक, पंकजा मुंडे काय निर्णय घेणार?
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर


