आनंद शितोळे : शिवसेना पक्षातील बंडाच्या मागे हिंदुत्व, अपमान वगैरे प्रेरणा आहेत यावर दुधखुळी माणस सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत. या बंडाच्या मागे भाजपचा हात वाटत नाही अस अजित पवार म्हणाले ते अर्धसत्य होत. बंडाच्या मागे असलाच तर फक्त ईडी-आयकर विभाग- सीबीआयचा हात आहे, पर्यायाने केंद्रीय महाशक्तीचा हात आहे. केंद्रात सत्तेत भाजप आहे. मोजके काही भिडू सोडले तर बाकीचे केंद्रात भाजप-राज्यात भाजप ,सत्तेची वळचण चांगली या हिशोबाने खोबर तिकड चांगभल म्हणून गेलेले आहेत.
या बंडामागची प्रेरणा फक्त इडी आहे, हव तर भाजपात गेल्यावर निवांत झोप लागते म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटीलांना विचारून घ्या. दुधाने तोंड पोळल्यावर निदान तोंडदेखल दाखवायला भाजपवाले ‘ हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ‘ अस म्हणतात हे निव्वळ विनोदी आहे. सगळ्या गावाला ठाऊक आहे सुरत, गौहत्ती, पंचतारांकित हॉटेल, सीआरपीएफ या सगळ्या यंत्रणा कोण हलवत आहे. आसामचा मुख्यमंत्री तिथे जाऊन येतोय एवढ पुरेस आहे. कथित महाशक्ती सगळी सूत्र हलवत असताना, आमदार कळपाने धावत असताना आघाडी सरकारने जे जे होईल ते मुकाट पाहावे अशी अपेक्षा फक्त मूर्खच करू शकतात. त्यामुळे सरकार वाचवायची धडपड तेही करणारच.
कायदेशीर बाबी, घटनात्मक तरतुदी याबद्दल अतिशय ज्ञानी मंडळी राजकीय पक्षात आणि कोर्टात आहेत. त्यावर मी भाष्य करण योग्य नाही मात्र हे सगळ दीर्घकाळ चालणारी, मानसिकदृष्ट्या थकवणारी लढाई आहे. इथे संयम बाळगून घाईत चुका न करणारे जिंकू शकतात.ताकदीचा, क्षमतेचा, बळाचा अहंगंड कामाचा नाही. उद्धव ठाकरे आणि उरलेल्या सेनेला ते महाराष्ट्रात असण्याचा फायदा आहे. सेनेच्या कार्यकर्त्यांचा आवेश आणि आक्रोश रस्त्यावर दिसू लागलेला आहे. रस्त्यावरची लढाई सेनेच वैशिष्ट्य आहे.
या सगळ्या साठमारीत अपरिमित नुकसान सेनेच झालेलं आहे. भले सरकार पडल नाही, बंड फसल तरीही या गेलेल्या आमदारांची विश्वासार्हता शून्यावर आलेली असेल. तिथ नव नेतृत्व उभ करण खायचं काम नाही. थोडेफार पैसे खर्चून ( चार दोन विमान आणि पाच पन्नास हॉटेलरूम्स म्हणजे थोडेफार नव्हेत किरकोळ चिरीमिरी आहे ) भाजपने सेनेला जिव्हारी लागणारा घाव दिलेला आहे. कॉंग्रेस कधीही सोबत येणार नाही, राष्ट्रवादी कधीही सोबत येऊ शकते पण सेना मात्र मतपेढीचा हक्काचा वाटा घेणारा पक्ष होता, त्याच्यावर केलेला घाव परिणामकारक ठरेल.
प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे ही जुनी नीती आहे संघाची. २०२४ च्या तोंडावर सेनेला उभ राहायला अपरिमित कष्ट उपसावे लागतील. फडणवीस नसतील पण केंद्रीय नेतृत्व निवांत आहे ते याचसाठी.सेनेवर घाव घालण्याच कारस्थान यशस्वी झालेलं आहे. ते यशस्वी झालेलं नाही आणि पुन्हा सेना सामान्य कार्यकर्ते घेऊन नव्या दमाने मतदारसंघ बांधून लोकसभा आणि विधानसभा आत्मविश्वासाने लढू शकते हे दाखवण्याची जबाबदारी उद्धव-आदित्य आणि सामान्य सैनिकांची.
या बंडातून घ्यायचा सगळ्यात मोठा धडा राष्ट्रवादीला. ईडीसमोर नांगी टाकणारी मंडळी बाजूला करून नव्या नेतृत्वाला पुढ आणल नाही तर पुढला नंबर त्यांचा आहे. भाजप कॉंग्रेसला कधीही पूर्णपणे संपवणार नाही ,संपू देणार नाही. जोवर तोंडदेखल्या निवडणुका देशात होताहेत तोवर मतदारांना बागुलबुवा कुणाचा दाखवायचा आणि चुकांची खापर कुणाच्या डोक्यावर फोडायची हा प्रश्न आहेच कि.
पुढे काय होईल याचे ठाम अंदाज वर्तवणारे सगळे गंडणार आहेत कारण सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग यामधल्या कळीच्या जागेवर असणाऱ्या लोकांची फक्त बुद्धिमता नव्हे तर त्यांची सदसद्विवेकबुद्धी आणि आत्मा पणाला लागणार आहे. सबब सगळा जांगडगुत्ता सुटेपर्यंत येणाऱ्या मिम्स आणि विनोदी पोस्टचा आनंद घ्या. मनोरंजन मे कोई कमी नही होनी चाहिये. दर पाच वर्षांनी बटण दाबल्यावर तुमच्या माझ्या हातात दुसर काय असतय वाट पाहण्याशिवाय ?
आनंद शितोळे
#महाराष्ट्र_देशा
#महाराष्ट्रद्रोही_भाजप
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

