पुणे : अनेक दिवस शांत असलेले सोलापूर हे शहर कालपासून राजकीय पटलावर चर्चेत आले आहे. सोलापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. यातूनच परवा रात्री आठच्या सुमारास पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. हा भ्याड हल्ला राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे.
यानंतर, भाजप नेत्यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील या कृत्याचा निषेध करतानाच पवारांवरील टीकेला देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर काल कोरोना नियमांचे भंग केल्याने पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आहे. तोडफोड करणारे दोघे पडळकर समर्थक असल्याची चर्चा आहे.
खरतर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही संवादाची आहे हे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. अशा पद्धतीच्या राडा संस्कृतीचे कुणीही समर्थन करणे हे निषेधार्ह आहे. एकमेकांना धमक्या देणे, एकमेकांवर हल्ला घडवून आणणे, राडा करणे यासाठी बिहार-युपी कुप्रसिद्ध आहे महाराष्ट्र नव्हे हे येथे नमूद करावे लागेल. काल एका वृत्त वाहिनीवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्याचे कौतुक करून खा. शरद पवार हे ज्या सुसंस्कृत राजकारणाच्या गप्पा मारत असतात त्यांची पार्टी कोणत्या दिशेने चालली आहे हे दाखवून दिले.
पडळकर यांनी पवार किंवा इतर नेत्यांवर सभ्य भाषेत टीका करावी याबाबत कुणाचेही वेगळे मत असू शकत नाही. मात्र पडळकर यांनी पातळी सोडून नये अशी अपेक्षा व्यक्त करताना आपण आपली मर्यादा सोडतो आहोत का याचे राष्ट्रवादीने देखील भान राखणे आवश्यक आहे. आ. अमोल मिटकरी ज्या पद्धतीची विषारी भाषा भाजपवर टीका करताना वापरतात त्याबद्दल त्यांना समज द्यावी असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटत नाही. पडळकर जे प्रश्न उपस्थित करत आहेत त्यावर मुद्देसूद उत्तरे देणे राष्ट्रवादीसाठी खरंच एवढी अवघड गोष्ट आहे का असा देखील सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ शकतो. पडळकर हे पवारांवर टीका करण्यासाठी सोडले आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे नेते करतात मग मिटकरी हे फडणवीस-पाटील यांच्यावर टीका करण्यासाठी सोडले आहेत का याचे देखील उत्तर राष्ट्रवादीला द्यावे लागेल.
राजकारण हे समाजहिताचे असावे त्यासाठीच लोकांनी या नेत्यांना निवडून दिलेले असते मात्र अशा पद्धतीने राडा करण्यात हे नेते दंग राहणार असतील तर मग वंचित समाजाचा विकास होणार तरी कसा ? दोन्ही पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे आणि समाजोन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. विचारांची लढाई विचारांनी लढावी त्यासाठी हल्ला हा पर्याय होऊ शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- क्वारंटाईनमधून बाहेर येताच भारतीय खेळाडूंची पूल पार्टी ; फोटो होतोय व्हायरल
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

