बीड – शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये वेळ प्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाची कर्ज घेण्याची देखील शासनाची मानसिकता असून नुकसान झालेला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, ग्राम विकास, बंदरे, खार जमीनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल केले.
अतिवृष्टीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे झालेले नुकसान पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री सत्तार बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, कुंडलिक खांडे ,सचिन मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
सत्तार म्हणाले , सध्या समोर येत असलेले नुकसानीचे आकडे अंतिम नाहीत पंचनामे सुरू असून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये जवळपास सरासरीच्या एकशे तीस टक्के पर्यंत पाऊस झाल्यामुळे मोठी नुकसान झाली आहे. पाहणी पंचनामे यातील आकडेवारीत व नुकसानीत वाढ होईल शेतांमध्ये पाणी साचले असून जाण्यासारखी देखील स्थिती राहिलेली नाही मराठवाड्यातील बीड सह उस्मानाबाद, लातूर जालना जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात कापूस व सोयाबीन ची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती त्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे त्या खालोखाल मूग, उडीद, ज्वारी , पपई आदी विविध प्रकारच्या पिकांमुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे असे सत्तार यांनी सांगितले.
ते म्हणाले, केंद्र सरकार कडून देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी राज्य सरकारकडून केली आहे . शेतकऱ्यांवर अनेक अस्मानी संकट येत असतात त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी शासन यंत्रणेने काम करण्याची गरज आहे यासाठी आनेवारी , पिक कापणी प्रयोग आदी प्रसंगी संवेदनशीलपणे काम करण्याची गरज आहे.
प्रत्यक्षात शेतामध्ये जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. याच बरोबर शेतकरी स्वतः देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोबाईल ॲप द्वारे स्वतः झालेल्या नुकसानीचा फोटो व व्हिडीओ अपलोड करून त्याची माहिती देऊ शकतात असे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा कृषी अधिकारी निकम यांनी बीड जिल्ह्यात ७ लक्ष ७६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ७ लक्ष ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती व यापैकी कापूस व सोयाबीन या पिकांचे क्षेत्र साडे पाच लक्ष हेक्टर पेक्षा जास्त होते याच बरोबर तूर , उडीद, मूग आदी क्षेत्रावर देखील पेरणी झाली होती असे सांगून अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
- ‘कोरोना विषाणूच्या साथीपासून बचावासाठी अजून दोन महिने सतर्क रहा’
- ‘अजितदादांनीच आता शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी’
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- भाजप नगरसेवकांची मुंबईत महापौरांच्या विरोधात निदर्शने
- नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप ; वाद वरिष्ठांकडे जाणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

