🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले. राज्यात असलेले महाविकासआघाडी सरकार सरकार कोसळले. त्यानंतर आता शिंदे गटाने व भाजपने मिळून राज्यात सरकार स्थापन केले आहे. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. यादरम्यान शिंदे व फडणवीस यांनी हे सरकार शिवसेना-भाजप युतीचे असल्याचाही दावा केला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही. मात्र या सगळ्या घटनाक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणे हा विषय गोंधळात टाकणार आहे. भाजपच्या या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. फडणवीसांच्या याच भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शरद पवारांच्या या वक्तव्यावरून निलेश राणेंनी थेट पवार कुटुंबीयांनाच टोला लगावला आहे.
३० जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राजभवनात शपथविधी पार पडला. या घडामोडीनंतर शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणे जेवढे धक्कादायक आहे, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास भाग पाडणे हे अधिक धक्कादायक आहे. असे शरद पवार म्हणाले होते.
“ज्यांनी पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, आता अडीच वर्षे ते विरोधी पक्षनेते होते, त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, भाजपाच्या वरिष्ठांचा व नागपूरचा हा आदेश असावा आणि नागपूचा आदेश म्हटले की तो तंतोतंत पाळावा लागतो. नागपूरचा आदेश मोडता येत नाही आणि सत्तेत जाण्याची संधी मिळाली तर, ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण म्हणजे फडणवीस होय,” अश्या शब्दांत शरद पवारांनी फडणवीस यांचे कान टोचले होते.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचेही पवार म्हणाले. शिवसेना पक्षातील ३९ आमदारांचे समर्थन एकनाथ शिंदे यांना आहे. त्याचबरोबर काही अपक्ष आमदाराचाही शिंदेंना पाठिंबा आहे. त्यामुळे शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदापेक्षा अधिकची मागणी भाजपकडे केली असणार. त्यामुळेच भाजप पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आणि याची कल्पना एकनाथ शिंदे यांना स्वतःलाही नसेल. असे मत पवार यांनी व्यक्त केले. “देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री,” असा टोलाही शरद पवार यांनी लगावला होता.
निलेश राणेंचा पलटवार
शरद पवारांच्या याच वक्तव्यावरुन महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणेंनी अजित पवारांचा उल्लेख करत टीका केली आहे. पवारांनी वक्तव्य केल्याच्या दुसऱ्या दिवशी निलेश राणेंनी ट्विटरवरुन, “पवार म्हणाले, ‘फडणवीस एकमेव माजी मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री झाले’, अजित पवार चार वेळा माजी उपमुख्यमंत्री जे एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत,” असे म्हटले आहे.
पवार साहेब म्हणाले फडणवीस साहेब एकमेव माजी मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री झाले,
अजित पवार चार वेळा माजी उपमुख्यमंत्री जे एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 1, 2022
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
