मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून काही ना काही मुद्द्यांवरून आघाडीत बेबनाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. तर, गेली दीड वर्षे हे सरकार स्थिरपणे चाललं असून पुढील पाच वर्षे देखील पूर्ण करेल असं नेते सांगत आहे.
मात्र, महाविकास आघडीतील पक्ष सत्तेसाठी एकत्र असले तरी नेत्यांसह कार्यकर्त्यांची फोडाफोडी ही सुरूच आहे. यावरून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असली तरी हे प्रकार अजून सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अनेक गौप्यस्फोट केले होते.
यावेळी त्यांनी शिवसेनेतील नेते-कार्यकर्त्यांच्या सुरु असलेल्या फोडाफोडीवरून देखील ठाकरेंना सावध केले होते. ‘एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष “एकला चलो रे” ची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे,’ असं म्हणत सरनाईक यांनी फोडाफोडीबाबत थेट उद्धव ठाकरेंकडे नाराजी वर्तवली होती.
आता सरनाईकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत केलेला दावा खरा ठरत असल्याचं दिसून येत आहे. एकाबाजूला महाविकास आघडीतील समन्वय आणि पक्ष प्रवाशांचा गोंधळ हाताळण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असून काँग्रेसने शिवसेनेला दोन मोठे धक्के दिले आहेत.
शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना बाळ्या मामा म्हणून ओळखले जाते. ते ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आहेत. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना असा प्रवास करून आता ते काँग्रेसच्या वाटेवर निघाले आहेत.
म्हात्रेंच्या जाण्यासोबतच शिवसेनेला विदर्भात देखील धक्का बसणार आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांशी वाद असल्याने त्यांनी काँग्रेसची वाट धरल्याचे बोलले जात आहे. इतकंच नाही तर त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे देखील याबाबत दाद मागितली होती. मात्र, त्यांना दाद न दिल्याने अखेर त्यांनी काँग्रेसची वाट धरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र ‘ओपनिंग अप’ कडे नेण्याचा निर्णय ; मुंबईत लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू होणार?
- ‘अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच; त्यांनीच कौरव कोण, पांडव कोण हे ठरवावं’
- मोठी बातमी : पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- डिसेंबरपर्यंत राज्यात 5 हजार पेालिसांची भरती करणार – दिलीप वळसे पाटील
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

