🕒 1 min read
औरंगाबाद: ग्रामीण भागातील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी आरोग्य सोयी सुविधांचा अभाव असून कोरोनाच्या संकट काळात याठिकाणी आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि. २६) वैजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेट दिली. त्यावेळी याठिकाणी सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून आला. वैजापूर मधील विदारक परिस्थिती पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कोरोना बाधित रूग्णांवर कशा पध्दतीने उपचार केल्या जातात, याठिकाणी कोणकोणती उपकरणे उपलब्ध आहेत, कोणकोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, डॉक्टर व इतर कर्मचार्यांची संख्या किती आहे आदींचा आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी आढावा घेतला. याठिकाणी जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, बायपॅप मशिन्स, मेडिसीन ट्रॉली आदी उपकरणांची आवश्यकता असल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले.
लागलीच सतीश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून वैजापूर येथील डेडीकेट कोविड हेल्थ सेंटरला आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी देखील त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन-तीन दिवसात याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सांगितले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागाला देखील मोठा विळखा घातला आहे. ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णांची वाढत जाणारी संख्या निश्चितच चिंताजनक आहे. ग्रामीण भागात कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्या जात असून नागरिक आजार अंगावर काढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आजार अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्याप्रमाणे वेळीच उपचार घ्यावेत असे आवाहन सतीश चव्हाण यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरण
- रहिवासी आणि खाजगी डॉक्टरांच्या वादात रुग्णांचा अडकला श्वास!
- रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद, जालन्यातून चोरी करायचे इंजेक्शन
- भय नको, पण आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणाही नको, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मात्र मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
