मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात वादळ निर्माण झाल्याच चित्र दिसत आहे.
या संदर्भात शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मात्र या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेस काय भूमिका घेणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणाबद्दल मौन सोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही आहोत आणि त्यांना आवश्यक ती मदत आंम्ही करणार असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे. शिवसेनेत अंतर्गत काय चाललाय हे आम्हाला माहित नाही परंतु आम्हाला हे सरकार टिकवायचं असल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले. विरोधी बाकावर बसण्याची तयारी करावी लागत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याच जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान , जे आमदार शिवसेनेतून गेलेत ते आल्यावर चित्र स्पष्ट होईल असा इशाराही जयंत पाटील यांनी यावेळी दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याची भूमिका स्पष्ट झाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्यापही काही ठाम प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


