मुंबई : एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.
दानवेंच्या या वक्तव्यानंतर शेतकरी नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. देशातील शेतकऱ्यांना खलिस्तान, पाकिस्तान आणि चीन हा आरोप करुन शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेवून मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान आहे असे सांगितले आहे त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. रावसाहेब दानवे हे केंद्रीयमंत्री आहेत त्यामुळे ही सरकारची भूमिका आहे की, रावसाहेब दानवे यांची हे सरकारने स्पष्ट करावे. जर सरकारची भूमिका असेल तर तोमर यांच्यासोबत बैठका का घेतल्या. गृहमंत्री अमित शहा का बैठका घेत आहेत. आणि असं असेल तर सरकारने काय केलं आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील त्यांच्या या विधानावरून चांगलीच खरडपट्टी केली आहे. सत्ताधारी विरोधकांना आणि विरोध करणाऱ्यांना ज्यावेळेस देशद्रोही म्हणू लागतात त्यावेळेला ते हुकूमशाहीचे निदर्शक असते. जगातील सर्व हुकूमशाही राज्यांनी त्यांच्या प्रशासनाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही असे म्हटले आहे. मोदी सरकारने गेल्या ६ वर्षापासून त्यांच्या विरुद्ध झालेल्या प्रत्येक आंदोलनाची देशाच्या विरोधातील कट म्हणूनच संभावना केली आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या गरिब शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चीन पाकिस्तानाशी जोडून शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे देशात लोकशाही नाही तर मोदीशाही असल्याचे दर्शवणारा असून या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे आणि दानवे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करत आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- ‘आता फक्त ईडीने फोन केला तरी मी हजर होईन, समन्सची गरज नाही!’
- आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार!; ‘त्या’ रानगव्याला पुणेकरांची अनोखी श्रद्धांजली
- …अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांची मुंबईकरांना ताकीद
- ‘सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नाही म्हणूनच शरद पवारांच्या नावाची चर्चा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
