अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले आहे. त्यानंतर आज त्यांनी सर्वोच्च न्यायालया रिव्ह्यू याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे. दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.
शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्यांच्या निवडीवर अडसूळ यांनी आक्षेप घेतला होता. यावर मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं ८ जून रोजी निकाल दिला होता. नवनीत राणा यांना हायकोर्टानं दोन लाखांचा दंडदेखील सुनावला. नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता.
जात प्रमाणपत्र वैध असल्याचा दावा
न्यायालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला कायदेशीरदृष्ट्या पूर्ण मान्यता व अधिकार आहेत, अशा न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी केली. या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे सदर जातपडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा या आधी तीन वेळा निर्वाळा दिला आहे.
हे एक राजकीय षडयंत्र
जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे आणि माझे खच्चीकरण करण्याचे काम केले जात आहे. हे एक राजकीय षडयंत्र आहे. मी संघर्ष करणारी महिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल आणि तेथे सत्याचाच विजय होईल असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या लेकीची ‘पॉवर’बाज कामगिरी! लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळे अव्वल
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी
- ‘शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार’, मेटेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- ‘परिचारिकांवर कोणाच्या आदेशाने लाठीचार्ज केला?’, अजित पवारांनी दुर्लक्ष केल्याने भाजप आक्रमक
- अजित पवारांच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांवर लाठीचार्ज


