🕒 1 min read
वैजापूर: तालुक्यातील बोरदहेगाव येथील शेतकऱ्यांनी टोकाचा विरोध सुरू केल्यामुळे नागपूर-मुंबई महामार्गाचे अवघे दीड किलोमीटर काम गेल्या काही दिवसांपासून रखडून पडले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गाच्या कामासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहे. परंतु महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर लगतच्या शेतकऱ्यांकडून जमिनीचे भूसंपादन झाले नसल्याचे कारण पुढे करून चक्क विद्युतपंपाद्वारे महामार्गावर पाणी सोडून कामात खोडा घातला जात आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाबरोबरच संबंधित ठेकेदाराची उदासिनताही यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे उर्वरित कामाला मुहूर्त कधी सापडणार? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील लासुरगाव ते कोपरगाव सीमेच्या हद्दीपर्यंत अशा २९ किलोमीटरपर्यंतच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निविदा काढून कामाची सुरुवात करण्यात आली. यापूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. मंजुरीनंतर महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू झाले. सध्यस्थितीत महामार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे.
परंतु तालुक्यातील बोरदहेगाव येथे या महामार्गाचे दीड किलोमीटर काम गेल्या काही दिवसांपासून रखडून पडले आहेत. या दीड किलोमीटर अंतरावरील खड्ड्यांचे साम्राज्य पाहता प्रवाशांच्या अंगावर काटे आणणारे आहे. खड्ड्यांचा व्यास व खोली पाहून आपण डोंगर – द-यातून प्रवास करीत असल्याची प्रचिती प्रवाशांना येते. या दीड किलोमीटर महामार्गाचा अपवाद वगळता उर्वरित महामार्ग गुळगुळीत झाला आहे. केवळ दीड किलोमीटर अंतरावरील प्रलंबित कामामुळे या कामाला गालबोट लागले आहे.
जमिनीचे भूसंपादन झाले नसल्यामुळे आम्ही महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. अस्तित्वात असलेल्या जागेवरच आम्ही महामार्गाचे काम सुरू करणार आहे. त्यामुळे भूसंपादन अथवा मावेजा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह नेतेमंडळींना मध्यस्थी घालून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरण प्रयत्नशील आहेत. दरम्यान महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचा विरोध व ठेकेदाराची उदासीनता आदी कारणांमुळे महामार्गाच्या कामाचे अजून किती दिवस भिजत घोंगडे पडणार ? हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जयभवानी नगरवासियांची दरवर्षी पावसाळ्यात एकच ओरड; ‘यंदा तरी पालिका पावणार का?’
- ‘पालखी सोहळ्याबद्दल सरकारने वेळेत निर्णय घेतला, तर बिघडतं कुठे?’; भातखळकरांचा सवाल
- जयभवानी नगरवासियांची दरवर्षी पावसाळ्यात एकच ओरड; ‘यंदा तरी पालिका पावणार का?’
- ‘संजय राऊतांचं नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता?’, चंद्रकांत पाटलांचा टोला
- राज्यात सगळ्या निवडणुका पार पडत असतील तर आषाढी वारीला काय अडचण आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
