मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय पक्षांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसल्याने राजकीय वातावरण देखील तापत आहे. अशातच काँग्रेसचे नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दोन महापालिका आयुक्तांच्या नेमणुकीची मागणी केली आहे.
पालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचं आहे, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस स्वबळावरच लढेल असं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील स्वबळावर लढण्याचं समर्थन केलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र लढावी अशी भूमिका घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आता काय भूमिका घेते हे महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- संभाजी महाराजांच्या नावाचा फलक फाडणाऱ्याला तात्काळ अटक करा – सचिन खरात
- महाराष्ट्र कोरोना लसीकरणासाठी सज्ज, राजेश टोपेंनी दिली लसीकरणाबाबत माहिती
- सामना किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही; विनायक मेटेंची शिवसेनेवर टीका!
- ‘अशोक चव्हाणांमुळे मराठा समाजावर वाईट वेळ’
- उदयनराजेंनी काल उदघाटन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा फलक अज्ञातांनी फाडला


