🕒 1 min read
मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला उतरती कळा लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. खडसे यांच्यापाठोपाठ राज्यभरातील त्यांच्या समर्थकांनी भाजपला रामराम ठोकला. तर, इतर काही आमदार देखील भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी केला होता.
दरम्यान, अनेक महिन्यांपासून राजकीय विजनवासात राहिलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज शिवसेनेचं शिवबंधन सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला लागलेली गळती थांबली असून महाविकास आघाडीमधील संपर्कात असलेले आमदार येत्या काळात भाजपमध्ये येणार असल्याचे सूचक विधान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मध्यंतरीच्या काळात बाळासाहेब सानप यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्याचे निमित्त साधून गिरीष महाजन यांनी भेट घेत पुर्नप्रवेशाचे बीज रोवले होते. जळगावातील बीएचआर घोटाळ्यासंदर्भात महाजन अडचणीत आल्याने प्रवेश लांबला. शिवसेनेने देखील सानप यांच्या सारखा मोहरा हातून जावू नये म्हणून मातोश्रीवर बोलावून घेताना मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले होते. आज त्यांच्या पक्षप्रवेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या भाजप कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
‘नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे तिथून भविष्यात आपला खासदार तिथून निवडून येणार आहे. पुढील काही काळात अनेक आमदार आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पण काही लोकं उगाच वावड्या उठवत असतात की, भाजपचे नेते आमच्याकडे येणार आहे. पण, मुळात त्यांच्या पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी ते अशा पुंग्या सोडत असतात. पण, त्यात काहीही तथ्य नाही. आमचे सर्व आमदार एकाच ठिकाणी आहे’ असं प्रत्युत्तर फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- रामाचे मंदिर वर्गणीतूनच होणार, खंडणीतून नव्हे; भाजपचा शिवसेनेला जोरदार टोला
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- ‘स्वतः देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांनी सांगितलंय की आता दुसरीकडे कुठेही जायच नाही’
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
