मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी मुंबई, नाशिक,नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहन मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे.
मराठा क्रांती मोर्चा : पोलिसाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू
काल औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र करण्यात आले आहे . दरम्यान,उद्याच्या नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कायदा सुव्यवस्था, शांततेचा भंग झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान,मराठा मोर्चा आयोजकांकडून उद्या मुंबई बंदचं आवाहन, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, तोडफोड होणार नाही असं आयोजकांनी पोलिसांना आश्वासन दिलं आहे.
नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या
- मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
- मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
- राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
- आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
- मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
- अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

