मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamta Banarjee) महाराष्ट्रात आल्या होत्या, त्यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका केली होती. महाराष्ट्रातले उद्योग बंगालला पळवायचा त्यांचा डाव होता, अशी टीका भाजपा आमदार अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत सामनाच्या रोकठोक मध्ये म्हणाले, ममता बॅनर्जींनी जाताना सोबत काहीच नेले नाही हे उगाच ओरड करणाऱ्यांनी आणि मुंबईला ओरबाडणाऱ्यांना साथ देणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भाजपा विरोधासाठी विरोध करतो, हे ममतांच्या दौऱ्यातही दिसलं. मुंबईत येऊन उद्योगपतींना भेटण्यात गैर काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राऊत पुढे लिहीतात, ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणारे भाजपा नेतृत्व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मुंबईतील हालचालींवर आक्षेप घ्यायला तयार नाही. ममतांच्या पाठोपाठ गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल त्यांचं अर्धं मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईतल्या उद्योगपतींना गुजरातचं निमंत्रण देण्यासाठी ते आले. आत्मनिर्भर गुजरात उभारण्यासाठी त्यांना मुंबईतील उद्योगपतींची मदत हवी. खुंटा बळकट करण्यासाठीच मुख्यमंत्री पटेल इथे अवतरले असंच भाजपाचं मत असायला हवं.
पटेल यांनी मुंबईत येऊन उद्योगपतींना साकडे घालायला काहीच हरकत नाही, पण भाजपाने ममतांवर नाहक टीका केली. म्हणून पटेलांचा विषय समोर आणला. योगी आदित्यनाथ तर मुंबईतील सिनेउद्योग लखनऊला नेण्यासाठीच आले. त्यावरही भाजपाने आक्षेप घेतला नाही. मंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र एका रात्रीत अहमदाबादला खेचून नेले. त्या लुटमारीवरही भाजपाने भाष्य केले नाही. पण ममता बॅनर्जी प्रकरणात भाजपाची भूमिका टोकाची आहे. ममता बॅनर्जी आल्या आणि महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या, असं राऊत यांनी रोकठोकमध्ये लिहीलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- ‘मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज’
- ‘… पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा इशारा
- ‘…आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत’, आदित्य ठाकरेंना बॅनर्जींचा सल्ला
- …तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती का?- अमित शहा


