औरंगाबाद : अजिंठा खोऱ्यात पाणी अडविण्यासाठी नैसर्गिक साधने उपलब्ध आहेत. शिवाय यासाठी कोणतीही जमीन संपादित करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अजिंठा खोऱ्यात तातडीने सर्वेक्षण करून सविस्तर आराखडा तयार करा. येथे पाणी अडविल्यास लिफ्ट इरिगेशनने याभागात पाण्याची उपलब्धता करता येईल. यासाठी अजिंठा येथील निजाम कालीन बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करणे तसेच अजिंठ्याच्या खोऱ्यात अधिक सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण कामाला सुरुवात करावी यासाठी निधी उपलब्ध करून देवू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील विविध विकास कामे व प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणेची बैठक संपन्न झाली. या बैठकीस मार्गदर्शन करीत असतांना ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील सिंचन सुविधेच्या बळकटीकरणसाठी प्रभावी नियोजन करा. तसेच मतदारसंघात अधिकच्या सिंचन सुविधा निर्माण करणे व पूर्वीच्या सिंचन प्रकल्पाचे दुरुस्ती करण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करून शासनास प्रस्ताव सादर करा, असे निर्देश सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
भराडी प्रकल्प रद्द झाल्यामुळे पूर्णा नदीवर सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी फेर नियोजन करून पूर्णा नदीवर बंधारे उभारण्यासाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या. सिद्धेश्वर खोऱ्यात पाणी साठवण व नियोजन करणे, शिवना ते अजिंठा गावाच्या रस्त्याने नवीन पाझर तलावासाठी सर्वेक्षण करणे, जुई नदीचे पाणी वाहून जाते सदरील पाणी अजिंठा-अंधारी प्रकल्पात वळविण्यासाठी उपाययोजना करणे, खेळणा मध्यम प्रकल्पाची जल साठवण क्षमता वाढीसाठी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात सर्व निकष व नियमांच्या अधिनराहून उपायोजना करणे, आज जरी पाणी असले तरी जस जसे पाणी कमी होत गेले तसे धरनातील संपादित क्षेत्रातील गाळ काढण्याचे नियोजन करून खेळणा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती करण्याची कारवाई पूर्ण करा असेही ते म्हणाले.
सोयगावच्या सावळतबारा, टिटवी धरणाकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्ती साठी प्रस्ताव सादर करणे, चारुतांडा येथील पुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करणे, निल्लोड येथील कायगाव रस्त्यावर असलेल्या धरनाला तडा गेला असल्याने सदरील तलाव फुटण्याची चर्चा गावात आहे. त्याची पाहणी करून उपाययोजना करने आदी विषयांवर सविस्तर चर्चा करून येत्या महिन्यात मतदार संघातील सिंचन आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह तरुणाला पडला चांगलाच महागात
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- रिषभचं ‘गली क्रिकेट’ कार्तिकवर पडलं असतं भारी; थोडक्यात बचावला खेळाडू


