अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करण्यासाठीचे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान अहमदनगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आहेत.
जिल्ह्यात मंगळवार दि.१५ सप्टेंबरपासून ह्या अभियानाची सुरुवात होणार आहे. या अभियानात कोरोनादूतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी आणि आजारी तसेच लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. ही मोहिम २५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यात दि.१५ सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सूचना केल्या.
यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, संपूर्ण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे या अभियानात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- #IPL : डेक्कन चार्जर्स ते सनरायझर्स हैद्राबादचा एक विलक्षण प्रवास…..!
- पुण्यातील रुग्णालयांचे होम पॅकेज, पारनेरकरांच्या मुळावर!
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी काही बोलणं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा अपमान – जितेंद्र आव्हाड
- मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय महागार्ग बंदचा इशारा; मराठा समाज आक्रमक
- सरकारची चूक दाखवल्यास जेलची हवा खावी लागेल; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला टोला


