लातूर: राज्यात तसेच जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे ऑक्सिजनचा वापर योग्य पद्धतीने करा, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या आहेत. तसेच जे रुग्णालय ऑक्सिजनचा अयोग्य वापर करत आहेत त्यांना समज देखील देण्यात आली आहे. परवानगी दिलेल्या चार खाजगी रुग्णालयांत ऑक्सिजन सिलेंडरचा वापर कशा पद्धतीने केला जात आहे, याची तपासणी जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने २१ एप्रिल रोजी केली. या पथकात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील डॉ. कडवकर यांचा समावेश होता.
या साथरोग आजारावर उपचार करण्यास चार खाजगी रुग्णालयांपैकी गेल्या २४ तासांत तीन रुग्णालयांत ऑक्सिजन सिलेंडरचा अति वापर झाल्याचे निदर्शनास आले तर एका रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा वापर योग्य पद्धतीने व शासकीय नियमाने होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे योग्य पद्धतीने ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करणाऱ्या रुग्णालयाचे कौतुक केले मात्र इतर तीन खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे निर्देश पत्र देण्यात आले असल्याची माहिती पडदुणे यांनी दिली.
प्रमाणापेक्षा जास्त वापर करणाऱ्या तीन रुग्णालयांपैकी पहिल्या रुग्णालयात २४ रुग्ण ऑक्सिजन वर होते तर गेल्या २४ तासांत ८५ ऑक्सिजन सिलेंडरचा वापर झाला. दुसऱ्या रुग्णालयात २० रुग्ण ऑक्सिजनवर होते. त्यांच्यासाठी २४ तासांत ६३ ऑक्सिजन सिलेंडर वापरले गेले. तिसऱ्या रूग्णालयात २० रुग्ण ऑक्सिजनवर होते. चोवीस तासांत यांच्यासाठी ६० ऑक्सिजन सिलेंडर वापरले गेले. हे ऑक्सिजन वापराचे प्रमाण शासनाने आखून दिलेल्या नियमापेक्षा अधिक ऑक्सिजन वापर होत असल्याचे दिसून आले. चौथ्या खाजगी रुग्णालयात ३९ रुग्ण ऑक्सिजनवर होते. या रुग्णांसाठी गेल्या २४ तासांत या रुग्णालयाने शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा केल्याचे निर्दशनास आले. ३९ रुग्णांसाठी ३५ सिलेंडरचा वापर झाल्याचे दिसून आले.
या अतिवापराने इतर गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे या तिन्ही खाजगी रुग्णालयांनी शासकीय नियमानुसार रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करावा, असे निर्देश पत्र दिल्याची माहिती पडदुणे यांनी दिली. राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना जिथे ऑक्सिजन उपलब्ध आहे तिथे ऑक्सिजनचा वापर योग्य पद्धतीने करावा असे सूचना सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चोराने कोरोना व्हॅक्सिन परत केली; जयंत पाटलांनी काळा बाजार करणाऱ्यांना झापलं !
- पाल गावासाठी कोरोनाची लस उपलब्ध करून द्या – भाजपा युवा मोर्चा
- देवेंद्रजी, राज्यातील जनतेशी बांधिलकी जपा, जनतेसाठी केंद्राशी दोन हात करायला पुढे या! – नाना पटोले
- महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा ; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
- ब्रेक द लाईफ! संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या कामगार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ


