🕒 1 min read
मुंबई : गतवर्षी पश्चिम बंगालसह पाच राज्यांत निवडणुका असताना ८०-९० रुपयांपर्यंत दोन महिने स्थिर ठेवलेले पेट्रोल-डिझेलचे दर निवडणुका संपताच शंभरीपार गेले होते. आता उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांसाठी तीन महिन्यांपासून रोखून धरलेले इंधनांचे दर निकाल जाहीर होताच ५ ते १५ रुपयांनी महागण्याची शक्यता आहे, असे तज्ञ सांगतात.मतदारांच्या आणि जनतेच्या डोळ्यांत केलेली ही धूळफेक आहे. अशी बनवेगिरी करणाऱ्या पक्षाचे आणि सरकारचे काय करायचे, याचा फैसला आता जनतेनेच करायला हवा, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘निवडणुका हा आपल्या देशातील मोठा मनोरंजक खेळ आहे. निवडणुकांच्या आखाडय़ात उतरणारे राजकीय पक्ष जसे या लाडक्या सणाची वाट पाहत असतात, तसेच जनता व मतदारही तात्पुरती चंगळ म्हणून निवडणुकांच्या धूमधडाक्यात उत्साहाने सहभागी होतात. निवडणुका म्हणजे मतदारांना आणि जनतेला आंजारण्या-गोंजारण्याचा काळ. मतदान होईपर्यंत मतदारांना देवासमान मानून त्यांच्या पायावर लोळण घ्यायची आणि एकदा का निकाल लागले की, ‘तुम कौन, और हम कौन?’ असाच एकंदर खाक्या असतो. निवडणुकांचा आजवरचा इतिहास तेच सांगतो.’
दरम्यान, उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यांत सध्या होत असलेल्या निवडणुकांतही तेच घडते आहे. या निवडणुकांत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसू शकतो, अशी भीती निवडणुकांच्या आधी व्यक्त केली जात होती. त्याची नोंद घेऊन केंद्र सरकारने तब्बल शंभर दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत. दररोज होणाऱ्या दरवाढीला तीन महिन्यांचा ब्रेक लागल्यामुळे देशातील जनता तात्पुरती का होईना, सुखावली आहे. मात्र इतके दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिले म्हणून जनतेने फार हुरळून जाण्याचेही कारण नाही. कारण थांबवलेली दरवाढ हे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपुरते सरकारने दिलेले ‘चॉकलेट’ आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर होईपर्यंत जनतेने हे चॉकलेट चघळत बसावे आणि निकाल जाहीर झाल्याबरोबर जनतेच्या घशातील चॉकलेट काढून दरवाढीचा जबर दंडुका टाळक्यात हाणायचा, असा सरकारचा विचार दिसतो, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- नारायण राणेंना बीएमसीची नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- IND vs WI: भारतीय संघाचा वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा टी २० सामना आज रंगणार
- “…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली”, भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना टोला
- पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अन्याय करणाऱ्या निर्णयात काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत शिवसेनाही- केशव उपाध्ये
- “साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले मोदी सरकार चुका मान्य न करता नेहरूंना दोष देतात’, मनमोहन सिंग यांनी सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
