मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला.
राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संताप अनावर झाला. “एकीकडे हजारोंच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन होऊ शकतं. दुसरीकडे बारमध्ये कितीही लोक गेले तरी चालत. पण, राज्याच्या विधिमंडळामध्ये करोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचं नाही,” असा मु्द्दा उपस्थित करत फडणवीस ठाकरे सरकारवर चांगलेच भडकले.
जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘दोन दिवसांचे अधिवेशन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे. अनिर्बंध झालेलं प्रशासन आणि मदमस्त झालेले मंत्री, याच्या भरवशावर हे महाराष्ट्र चालवणार आणि आम्ही प्रश्नही विचारायचे नाहीत. या दोन दिवसांच्या अधिवेशनाचा आम्ही निषेध करतो. बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात सरकारला अधिवेशनात जाब विचारू. आम्ही शांत बसू शकत नाही. लोकशाही मूल्यांची पायमल्ली आणि लोकशाहीची मुस्कटदाबी होत असेल, तर जनतेचा आवाज आम्हाला बनावंच लागेल.
सरकार आहे की तमाशा?
या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आणि मराठा समाजाचं आरक्षण गेलं. पण, या सरकारचे मंत्री स्वतः मोर्चे काढत आहे. ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, ते मोर्चे काढत आहेत आणि कोर्टात बाजू मांडत नाहीत. त्यामुळे सरकार आहे की तमाशा, अशी परिस्थिती जनतेला बघायला मिळत आहे,” असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘हिंसाचार प्रकरणाचा तपास आयोगच करणार’, हायकोर्टाने ममता सरकारला फटकारले
- ‘७० टक्के लसीकरणानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका’, ग्रामविकासमंत्र्यांची माहिती
- नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद संसदेत! भाजपने केली ‘ही’ मागणी
- ‘काश्मीरवर तोडगा निघाल्यास अण्वस्त्रांची गरजच नाही’, पाक पंतप्रधानांचा भारताला इशारा
- ‘बावनकुळेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही’, विनायक राऊतांचा टोला


