नांदेड : परळी येथील गोपीनाथगडावरून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी भाजपच्या सचिव पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर डॉ. भागवत कराड सोमवारी सकाळी लातूरमार्गे परळी शहरात दाखल झाले होते. यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है अशा घोषणा दिल्या. यावर पंकजा यांनी घोषणा देणाऱ्यांना चांगलेच झापले. यानंतर जन आशीर्वाद यात्रे दरम्यान परळी येथे कोणत्याही घोषणा झाल्या नाहीत, मी आशा कोणत्याही घोषणा ऐकल्या नाही, असे म्हणत कराड यांनी त्या घटनेवर पांघरूण घातले.
भागवत कराड हे आज मंगळवारी नांदेडमध्ये आले होते. परळीतील प्रकाराबद्दल कराड यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी असा काही प्रकार झाला नसल्याचे सांगितले. तसेच मी कोणत्याही घोषणा ऐकल्याच नाहीत. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत असे म्हणून त्यांनी झालेल्या प्रकारावर पांघरूण घातले.
काय घडले होते परळीत?
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे परळीत यशश्री निवासस्थानी आगमन झाल्यापासून मुंडे समर्थक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती. वैद्यनाथ मंदिराकडे सर्व जण निघाल्यानंतरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. याच कार्यकर्त्यांनी गोपीनाथगडावरही प्रचंड घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा पंकजा मुंडे यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना डाफरत आपले असे संस्कार नाहीत. अंगार, भंगारच्या घोषणा देणाऱ्यांनी पुन्हा माझ्याकडे यायचे नाही असा दम त्यांनी भरला.
‘मी तुम्हाला असं वागायला शिकवलंय का? मूर्ख कुठले? मुंडे साहेब अमर रहे… या घोषणा मी रोखू शकत नाही. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. पण अंगार, भंगार हे काय लावलंय? हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का?,’ असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. ‘असं वागणं मला शोभत नाही. जेवढ्या मोठ्या उंचीची मी आहे, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची. नाहीतर मला भेटायला येऊ नका,’ असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका


