औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. मार्च महिन्यात तर रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले. आणि स्मार्ट सिटी बस बंद करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली शहर बससेवा आता मंगळवारपासून (दि.८) सुरु करण्याचा निर्णय औरंगाबाद महानगरपालिकेने घेतला आहे. उद्यापासून पाच मार्गांवर १६ स्मार्ट बस २४१ फेऱ्यांद्वारे बससेवा देतील. विनामास्क बसमध्ये प्रवेश करता येणार नाही.
फेब्रुवारीत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अचानक उसळी मारली. मार्च महिन्यात तर जिल्ह्यात तब्बल ३२ हजार ३१३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा ताण वाढला. कोविड केयर सेंटर वाढवण्यात आले. मात्र ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची मोठी समस्या निर्माण झाली. एप्रिलपर्यंत रुग्णसंख्येने ४१ हजारांचा आकडा पार केला होता. दररोज हजार ते बाराशे रुग्ण आढळून येण्याला एप्रिलच्या शेवटच्या आठवडयात ब्रेक लागला. रुग्णसंख्या अधिकच घटल्याने महापालिकेने अनेक कोविड केअर सेंटर्स तूर्तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील रुग्णसंख्या घटल्याने १ जूनपासून कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर आजपासून औरंगाबाद शहर पूर्णत: अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने मंगळवारपासून स्मार्ट सिटी बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी कोविडच्या सर्व नियमांचा अवलंब करून बस सेवेचा घेण्याचे आवाहन स्मार्ट शहर बस विभाग यांच्या कडून करण्यात येत आहे.
पहिल्या टप्यात सिडको ते रेल्वे स्टेशन मार्गे – टीव्ही सेंटर, औरंगपुरा ते रांजणगाव मार्गे – मध्यवर्ती बस स्थानक, औरंगपुरा ते छत्रपती शिवाजी नगर मार्गे – महावीर चौक, सेव्हन हिल, सिडको ते घाणेगाव मार्गे – रांजणगाव, मायलन, सिडको ते जोगेश्वरी मार्गे – रांजणगाव या पाच मार्गांवर २४१ फेऱ्यामार्फत १६ बसेस बससेवा देतील. अशी माहिती मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर आणि उप व्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- गळफास घेऊन कामगाराची आत्महत्या
- व्यापाऱ्यांच्या माथी पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणीचा फार्स, मनपाचे नियोजन शून्य!
- वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, शहरातून पुन्हा पाच दुचाकी लंपास
- मोदींच्या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेचा वेग वाढणार ; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- अनलॉकच्या दिवशी पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; आज दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या


