नाशिक : राज्यातील ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते १५ एप्रिल २०२० या पंधरा दिवसात राज्यातील १ कोटी ३५ लाख ५४ हजार ४४१ शिधापत्रिका धारकांना तब्बल ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.
राज्यात या योजनेमधून सुमारे १८ लाख ५१ हजार ०४३ क्विंटल गहू, १४ लाख २८ हजार ५४५ क्विंटल तांदूळ, तर १७ हजार १२१ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेल्या परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ६ लाख ६८ हजार ६२२ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहेत त्याठिकाणी शासनाच्या पोर्टेबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. ३ एप्रिलपासून पात्र रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वितरित करण्यात येत असून १० लाख ८० हजार २१० क्विंटल तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी ३५ लाख ८२० क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहेत. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.


