नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं. शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात देखील भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाडसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी पाठिंबा दिल्याने बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतआहे. सकाळपासूनच गजबजणाऱ्या बाजार समितीमध्ये कुठल्याच मालाची आवक झाली नाही.
दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- डिसले गुरुजी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्कार
- भारत बंद विरोधात केंद्राला पाठींबा देण्यासाठी रस्त्यावर उतरा; विखेंचं शेतकऱ्यांना आवाहन
- ‘…तर आपण शेवटचे आंदोलन करण्यास पुन्हा मैदानात उतरणार’; अण्णा हजारेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- कोरोना खरंच वाढतोय? जाणून घ्या राज्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या
- नवे कृषी कायदे म्हणजे अंबानी-अदानींना पायघड्याच! – राजू शेट्टी


