🕒 1 min read
मुंबई: मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने आज विराट मोर्चाचं आयोजन केले होते. राज्यभरातून भाजपचे हजारो कार्यकर्ते आझाद मैदानात जमले होते, यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांसह अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर घणाघाती आरोप केले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतो. शरद पवारसाहेब म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल जमत तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवताय. तुम्हाला सरकार लखलाभ असो. पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल. मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं? असं बाळासाहेब विचारतील तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? आम्ही सांगू, बाळसााहेब आम्ही संघर्ष केला. पण आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही. राजीनामा मागितला तर सरकार जाईल अशी भीती त्यांना वाटत होती, असं आम्ही बाळासाहेबांना सांगू”.
“कुणाच्या दाढ्या कुरवाळताय?”
“जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का? तुम्ही कुणाच्या दाढ्या कुरवाळताय हे आम्हाला समजलं पाहिजे. आजचा मोर्चा ही तर फक्त सुरुवात आहे, आमचा संघर्ष सुरूच राहील. मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवय आम्ही स्वस्थ बसणार नाही.” असं म्हणत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
