🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन भाजपासोबत सरकार स्थापन करू शकतात. याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले आहे. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.
यानंतर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या पोस्ट वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं. एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
तसेच माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू. आपला नम्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे… अशी पोस्ट उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
