जालना – येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या हॉस्टेल मध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्याने विद्यार्थ्यांनी आज सकाळी काॅलेज बंद पाडले. हॉस्टेलमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील दहा दिवसापासून फक्त एकच टँकर वसतिगृहाच्या परिसरात येत होता. हे एक टँकर दोनशे विद्यार्थ्यांसाठी अपुरे असल्याने मागील दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. मागील तीन दिवसांपासून तर एकही टँकर न आल्याने विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एकत्र जमत काॅलेज सुरू न होऊ देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, प्रकरणाची माहिती मिळताच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घालत आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. वसतीगृहात मिळत असलेले निकृष्ट दर्जाचे जेवण, बाथरूममध्ये असलेली अस्वच्छता व त्यामुळे पसरणारी दुर्गंधी, खोल्यांमध्ये फुटलेल्या ट्युबलाईटस इत्यादी समस्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर लवकरच या समस्या सोडवण्याचे आश्वासन कैलास गोरंट्याल यांनी दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असुन त्यानंतर महाविद्यालय सुरळीत चालु झाले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

